मुंबई : विविध कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या कामगार कायद्यांविरोधात आणि काही आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.
संपामध्ये देशातील १० प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियनचा सहभाग असून INTUC, AITUC, HMS, CITU यांसह इतर संघटनांनी कामगारांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नव्या लेबर कोडमुळे नोकरीची सुरक्षितता कमी होईल, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे स्वातंत्र्य वाढेल आणि किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षेवर परिणाम होईल, असा आरोप संघटनांनी केला आहे.
मुख्य मागण्या
चारही नवीन कामगार कायदे रद्द करणे, काही प्रस्तावित विधेयके मागे घेणे आणि मनरेगा अधिक बळकट करणे या प्रमुख मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनांबाबतही संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे.
काय सुरू, काय बंद?
संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही बँक कर्मचारी संघटनांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रिझर्व्ह बँक किंवा संबंधित बँकांकडून अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत कोणताही राष्ट्रीय स्तरावरील आदेश देण्यात आलेला नाही. काही राज्यांत, विशेषतः केरळ, कर्नाटक आणि ओडिशा येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार शैक्षणिक संस्था व कार्यालयांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी प्रवास किंवा बँक व्यवहारांपूर्वी संबंधित विभागाकडून अद्ययावत माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.