रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी 'एमआयडीसी'
रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई:- इंदापूर तालुक्यातील औद्योगिक विकासाला आज नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल एक हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ही बाब विशेष महत्त्वाची आहे.
इंदापूर तालुक्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्मितीचे स्वप्न दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. इंदापूरचे आमदार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही यासाठी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता.
या निर्णयामुळे इंदापूर, बारामती व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळणार असून, हजारो युवकांना रोजगाराच्या संधी, स्थानिक उद्योजकतेला चालना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. औद्योगिक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक निर्णायक टप्पा गाठला असून, इंदापूर लवकरच नव्या उद्योगांचा केंद्रबिंदू म्हणून उभे राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.