Mumbai Climate Week: देशातील पहिल्या क्लायमेट वीकचे मुंबईत आयोजन

बिल गेट्स, सचिन तेंडुलकर, हिलरी क्लिंटन, नोएल टाटा, नादिर गोदरेज, रोहिणी निलेकणी यांची उपस्थिती


मुंबई: मुंबईत पहिल्यांदाच १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्लू) चे आयोजन करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमादरम्यान मुंबई हे ग्लोबल साऊथमधील हवामान नेतृत्वाचे प्रमुख व्यासपीठ ठरणार आहे. या काळात भारत आणि जगभरातील सरकारप्रमुख, उद्योगजगतातील नेते, हवामान क्षेत्रातील नवोन्मेषक, दानशूर संस्था, युवक तसेच स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी एकत्र येऊन हवामान विषयक चर्चेपासून प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करतील.


मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे असलेल्या मध्यवर्ती केंद्रामार्फत करण्यात येणार असून, त्याचबरोबर शहरभर विविध शैक्षणिक संस्था, वसाहती आणि सांस्कृतिक ठिकाणी कार्यक्रमांचे जाळे उभारण्यात येणार आहे. या उपक्रमांमधून प्रत्यक्ष अंमलात आणता येतील अशा हवामान उपाययोजनांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.


हवामानावरील ही जागतिक पातळीवरील चर्चा पुरस्कारप्राप्त स्वयंसेवी संस्था प्रोजेक्ट मुंबई यांच्या नेतृत्वाखाली होत असून, महाराष्ट्र शासन, पर्यावरण व हवामान बदल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे या सप्ताहास सहकार्य लाभले आहे. या उपक्रमामुळे मुंबईला भारत तसेच इतर ग्लोबल साऊथमधील शहरांसाठी हवामान उपाययोजनांची ‘लाईव्ह टेस्ट बेड’ म्हणून स्थान दिले जात आहे.


मुंबई क्लायमेट वीकविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई क्लायमेट वीकद्वारे हवामान बदलावर कृती करण्याचा भारताचा ठाम निर्धार शहर पातळीपासून जागतिक स्तरापर्यंत अधोरेखित होतो. भारत आणि जगभरातील सरकारे, उद्योग, वित्तसंस्था, तज्ज्ञ आणि युवक मुंबईत एकत्र येत असताना, महाराष्ट्र आपल्या नागरिकांसाठी आणि ग्लोबल साऊथमधील देशांसाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सक्षम भविष्यासाठी सर्व भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहे, असा स्पष्ट संदेश यातून दिला जात आहे.”


प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक शिशिर जोशी म्हणाले, “मुंबई ही नेहमीच जिद्द आणि कल्पकतेसाठी ओळखली जाणारी नगरी आहे आणि मुंबई क्लायमेट वीकमध्ये हीच ऊर्जा हवामान संकटाशी मोठ्या प्रमाणावर भिडताना दिसेल. ही भारतातील पहिली अशा स्तरावरील नागरिकांच्या नेतृत्वाखालील हवामान चळवळ आहे, जिथे मंत्री, उद्योगजगतातील नेते आणि तज्ज्ञ हे विद्यार्थी, प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी आणि परिसरातील स्वयंसेवक यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर सहभागी होतील. यामुळे ग्लोबल साऊथमधील हवामान नेतृत्व प्रत्यक्षात कसे असते, हे मुंबई दाखवून देईल.”



जागतिक व राष्ट्रीय नेतृत्व


मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान धोरण, वित्त, उद्योग आणि नागरी समाजातील आंतरराष्ट्रीय व भारतीय नेतृत्व सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय वक्त्यांमध्ये हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, रॉकीफेलर फाउंडेशनचे प्रतिनिधी राजीव शाह, आयएफसी (वर्ल्ड बँक समूह) दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक इमाद फखुरी, एन्व्हायर्नमेंटल डिफेन्स फंडच्या कार्यकारी संचालक अमांडा लेलँड आणि अलाइड क्लायमेट पार्टनर्सच्या वरिष्ठ सल्लागार क्लॅरिसा डी फ्रँको यांचा समावेश आहे.


भारतीय सार्वजनिक क्षेत्रातून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहर आणि प्रादेशिक नेतृत्वाचाही सहभाग असणार आहे.


उद्योग व वित्त क्षेत्रातून अमित चंद्रा (बेन कॅपिटल), अंकुर गुप्ता (ब्रुकफिल्ड), व्ही. वैद्यनाथन (आयडीएफसी बँक), जामशेद गोदरेज, नादिर गोदरेज, अंजली रवीकुमार (झोमॅटो), प्रतीक अग्रवाल (सेरेंटिका रिन्युएबल्स) आणि समीर सिसोदिया (रेनमॅटर फाउंडेशन) सहभागी होणार आहेत.


पर्यावरण विषयासाठी काम करणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीतील व्यक्तींमध्ये दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर यांचा सहभाग असेल.

Comments
Add Comment

मुंबईच्या महापौर, उपमहापौरपदाची आज निवडणूक

तब्बल ४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर आणि

मुंबई महापालिकेने आणखी १० मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे केली जाहीर

तब्बल १०० कोटींच्या आसपास आहे थकीत कराची रक्कम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची थकीत

कोस्टल रोडवर ऐकू येणार जय हो

मार्गिकेवर विशेष संगीत पट्ट्यांमुळे वाहनचालकांना अनोखा अनुभव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वाहतूक कोंडी विरहित,

Mumbai 3.0: नवी मुंबईलगत तिसरी मुंबई लवकरच आकार घेणार

भूसंपादन-भूवाटप धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता; नवनगर विकास प्राधिकरणामार्फत नियोजित शहरीकरण करणार मुंबई : नवी

महाराष्ट्राच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत 'हे' महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुंबई : नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. यातून ५७ अपूर्ण

महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळ आणि स्थानके

मुंबई : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने