डोंबिवली : बारावीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस एका कुटुंबासाठी कधीही भरून न येणारे दु:ख घेऊन आला. डोंबिवली येथील सोहम सचिन कटरे हा विद्यार्थी आज मंगळवारी आपला बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी मोठ्या उत्साहात घरातून निघाला होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. सकाळच्या वेळी लोकलमध्ये असलेल्या प्रचंड गर्दीचा फटका सोहमला बसला. धावत्या ट्रेनमध्ये सामावून घेण्याची जागा नसल्याने, तोल जाऊन सोहम रेल्वे रुळावर कोसळला आणि या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या हातांनी सोहमला उत्तरपत्रिका लिहायची होती, त्याच सोहमचा मृतदेह घरी परतल्याने संपूर्ण डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वेतील वाढती गर्दी विद्यार्थ्यांच्या जीवावर कशी बेततेय, हे या हृदयद्रावक घटनेने पुन्हा एकदा समोर आणले आहे.
मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क ...
बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला दिवस एका विद्यार्थ्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी काळ ठरला आहे. डोंबिवली येथे राहणारा सोहम सचिन कटरे हा विद्यार्थी मंगळवारी सकाळी आपला इंग्रजीचा पहिला पेपर देण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडला होता. मात्र, कळवा आणि मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान लोकलमध्ये असलेल्या अलोट गर्दीमुळे त्याचा तोल गेला आणि तो धावत्या ट्रेनमधून खाली कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की, सोहमचा जागीच मृत्यू झाला. सोहमचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनीषा विद्यालय येथे होते. डोंबिवली ते कळवा हे अवघ्या काही मिनिटांचे अंतर कापून त्याला परीक्षेला पोहोचायचे होते. मात्र, सकाळच्या 'पिक अवर' मधील गर्दीमुळे त्याला डब्यात सामावून घेता आले नाही आणि नियतीने त्याच्यावर घाला घातला. ज्या वयात हातामध्ये पेन घेऊन उज्ज्वल भविष्याची उत्तरपत्रिका लिहायची होती, त्याच वयात सोहमवर काळाने झडप घातली. या हृदयद्रावक घटनेमुळे सोहमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेण्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.
डोंबिवलीच्या सोहम कटरे या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मुंबईच्या लोकल प्रवासातील 'जीवघेणी गर्दी' आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटून उठला आहे. मध्य रेल्वेवर अशा हृदयद्रावक घटनांची मालिका थांबायला तयार नाही. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे धावत्या लोकलमधून पडून काही तरुणींना आपले प्राण गमवावे लागले होते, मात्र त्यातून रेल्वे प्रशासनाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार लोकल फेऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याने डब्यांमध्ये अलोट गर्दी होत आहे. मुंबईत एसी लोकल सुरू केल्यास स्वयंचलित दरवाज्यांमुळे प्रवाशांचे बाहेर पडणे थांबेल आणि असे अपघात टळतील, असे आश्वासन वारंवार दिले जाते. मात्र, पुरेशा प्रमाणात एसी लोकल चालवण्याचे नियोजन अद्यापही प्रतिक्षेतच आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसी लोकलचे तिकीट परवडणारे नसणे आणि साध्या लोकलमध्ये शिरण्यासाठी होणारी जीवघेणी धडपड, यामुळे प्रवाशांचा जीव दररोज धोक्यात येत आहे. सोहमसारख्या निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतर आता तरी रेल्वे प्रशासन या 'डेथ ट्रॅप'मधून प्रवाशांची सुटका करणार का? हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.