मुंबई : महाराष्ट्रात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही भरती डिजिटल पद्धतीने होणार असून तरुणांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या २० हजार पदांचा समावेश आहे. तर उर्वरित पदे आयोगाबाहेरील विविध विभागांमधील आहेत.
सेवा प्रवेश नियमावलीत मोठे बदल
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणा संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
भरती प्रक्रियेत आवश्यक कौशल्ये, पात्रता निकष आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेतले जातील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सेवा प्रवेश नियमावलीतील बदलांचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे.
पारदर्शक आणि डिजिटल भरती प्रक्रिया
भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाइन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Verification) आणि डिजिलॉकर प्रणालीचा (DigiLocker System) वापर करून प्रमाणपत्र पडताळणी सुलभ करण्यात येईल. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाइन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
राज्य प्रशासनात कार्यक्षमतेला गती
राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये 70 हजार पदे भरल्यानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल. भरती प्रक्रियेत कोणताही पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रणाली पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तरुणांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी स्वच्छ, वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित भरती प्रणाली उभारण्यावर शासनाचा भर असेल.