६ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
मुंबई: अधिवेशनात बोलू दिले जात नसल्याची तक्रार अनेक आमदार, विशेषतः नवीन आमदार करीत असतात. यंदा मात्र त्यांना तसे बोलण्याची मुभा मिळणार नाही. कारण, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा महिनाभर चालणार आहे. मंगळवारी (१० फेब्रुवारी) त्याबाबतच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी विधानसभेत सादर केला जाणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समित्यांच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. २३ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कोणतेही शासकीय कामकाज न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पहिल्या दिवशी अजित पवार यांच्याबाबत दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव संमत करण्यात येणार असून यावेळी प्रत्येक पक्षांचे गटनेते आणि तीन सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यात येणार आहे. तर, मुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडतील.