गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी तब्बल ४४ नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या महापालिकेच्या बालेकिल्ल्यात प्रबळ विरोधक म्हणून तरी आता भाजपचे नाव घेतले जात आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे शासन महापालिकेत असावे, आणि ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून वसई-विरारचा विकास व्हावा, असा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. मात्र बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीने भाजपचे तिसरे इंजिन रोखले. असे असले तरी ४४ नगरसेवकांचा मोठा डबा मात्र भाजपने डबल इंजिनच्या जोरावर काम करण्यासाठी वसई-विरारच्या राजकारणात पहिल्यांदा आपल्या इंजिनसोबत जोडून घेतला आहे.
आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पालघर जिल्ह्याची मोठी राजकीय ओळख म्हणजे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष. अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपरिषद राजकारणात गेली ३५ वर्ष बहुजन विकास आघाडीचेच एकहाती वर्चस्व आहे. वसई-विरार महापालिका झाल्यानंतर दोन्ही वेळा महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा राहिला. बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचेच आमदार अशी राजकीय आणि संघटनशक्ती असलेल्या बहुजन विकास आघाडीला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा हादरा बसला. बहुजन विकास आघाडीचे विधानसभेचे तीनही गड महायुतीच्या उमेदवारांनी जिंकले. त्यानंतर १३- १४ महिन्यातच झालेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत २०१५ च्या तुलनेत नगरसेवकांची संख्या घटली असली तरी बहुजन विकास आघाडीने ७१ नगरसेवकांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा महापालिकेवर आपला झेंडा फडकवला. या निकालाने २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर दुसरीकडे सतत १० वर्ष महापालिकेच्या सभागृहात केवळ एक नगरसेवक राहिलेल्या भाजपला ४४ असा मोठा आकडा असलेले नगरसेवक निवडून आणण्यात यश आल्याने भाजपच्या गोटातही सत्ता मिळाली नाही याचे एवढे दुःख नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही भागात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे असे संकेत या निकालाने दिले आहेत.
सर्वांगीण विकासासाठी समन्वय महत्वाचा : महापालिकेत आता बहुजन विकास आघाडी आणि राज्य आणि केंद्र शासनात महायुतीची सत्ता आहे. नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील हे पदावर विराजमान होताच त्यांनी सर्वांना सोबत घेऊन वसई-विरारचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. महापालिका क्षेत्रात तीन आमदार येतात. त्यामुळे विकासकामांसाठी आमदार आणि महापौर यांच्यामधील समन्वय महत्वाचा राहणार आहे. अतिक्रमित मालमत्ता धारकांना शास्ती, ओसी धोरण, झोपडपट्टी पुनर्विकास, शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, फेरीवाला धोरण, पालिका कर्मचाऱ्यांना नियमित करणे आणि उत्पन्न वाढ अशा अनेक बाबी महापालिकेला भविष्यात कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या सर्व कामांसाठी कोणाची काय भूमिका राहणार हे तर येणारा काळच सांगणार आहे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी दोन्ही राजकीय पक्षांनी खुशाल प्रयत्न करावेत, मात्र वसई-विरारच्या नागरिकांसाठी मतभेद न करता विकासाचे इंजिन सुसाट पळवावे, अशी अपेक्षा मतदारांकडून केली जात आहे.