मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे. जेव्हीएलआर ते कफ परेड हा दीर्घ प्रवास काही मिनिटांत शक्य झाला असला, तरी वरळी ते कुलाबा या भूमिगत टप्प्यात मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आरे जेव्हीएलआर ते सुरुवातीच्या काही स्थानकांपर्यंत मोबाईल नेटवर्क, इंटरनेट आणि कॉल सेवा सुरळीत सुरू असते. मात्र वरळी स्थानकानंतर सिग्नल गायब होतात. सुमारे ३० ते ४० मिनिटे प्रवासी ‘नॉट रिचेबल’ राहतात. या काळात ना कॉल लागत आहेत, ना इंटरनेट सेवा कार्यरत आहे.
या समस्येचा सर्वाधिक फटका कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि कॉलेजला जाणाऱ्या तरुणांना बसत आहे. प्रवासादरम्यान महत्त्वाचे कॉल, ऑनलाईन कामकाज, पेमेंट्स किंवा आपत्कालीन संपर्क पूर्णपणे ठप्प होत असल्याने अनेक प्रवाशांनी या मेट्रो प्रवासावर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवाश्यांच्या तक्रारींबाबत मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अॅक्वा लाईनचा मोठा भाग भूमिगत असल्याने मोबाईल नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरचं काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सर्व मोबाईल सेवा प्रदात्या कंपन्यांशी समन्वय साधून नेटवर्क मजबूत करण्याचं काम सुरू असून, लवकरच ही अडचण दूर केली जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
नेटवर्क समस्या कायमस्वरूपी नाही नव्या नेटवर्क सुविधा सुरु होईपर्यंत प्रवाश्यांना हा हा त्रास सहन करावा लागणार आहे; असेही मेट्रो प्रशासनाने सांगितल.