मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर, आता राज्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. शहरी भागातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता गावखेड्यांच्या विकासाची चावी कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतदारांच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप पहिला क्रमांक राखणार? राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर, आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा ग्रामीण ...
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय शोककळेनंतर, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी अखेर आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणारे हे मतदान लांबणीवर पडल्यानंतर आज, शनिवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदारांनी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी एकूण ७,४३८ उमेदवार नशीब अजमावत आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी ३६९ जागा महिलांसाठी राखीव असून महिला शक्तीची मोठी कसोटी या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरसह १२ प्रमुख जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. प्रशासनाने मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून २ कोटी ८ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आरक्षणाच्या गणितात अनुसूचित जातींसाठी ८३, जमातींसाठी २५ तर मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागांचे नियोजन करण्यात आले आहे. आजच्या या चुरशीच्या लढतीचा निकाल ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून स्पष्ट व्हायला सुरुवात होईल