- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा
मुंबई : “काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले आहे आणि आजही त्यांनी आपल्या धोरणात बदल केलेला नाही. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुलचालनाचे काम तेथील सरकारकडून सुरू आहे. या देशात जेव्हा जेव्हा तुष्टीकरणाचे, लांगुलचालन करण्याचे राजकारण झाले, त्या-त्या वेळी देशाला त्याचे नुकसान भोगावे लागले आहे. तरी देखील काँग्रेस पक्ष मतदानाकरता लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
तेलंगणमधील नगरपालिका निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होत. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मुस्लिमांना दिलेल्या चार टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत, कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले. ते आजही तुष्टीकरण करत आहेत. मात्र, आता लोक त्यांना साथ देणार नाहीत. मनुष्य कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, न्याय सर्वांसाठी समान आहे. मात्र, मतांसाठी सुरू असलेले तुष्टीकरण स्वीकार्य नाही”,
गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत सी-६० जवानांनी सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या ऑपरेशनमुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवानांचे कौतुक करत अभिनंदन केले. फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत नक्षलवाद्यांची एकच कंपनी शिल्लक होती, आणि त्या कंपनीतील प्रमुख सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे ऑपरेशन दुर्गम आणि घनदाट जंगलात पार पाडण्यात आले, आणि तीन दिवस सलग पोलिसांनी रणनीती आखून दोन बाजूंनी घेरा घालून नक्षलवाद्यांना अडवले. या चकमकीत नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकर याचा खात्मा झाला. प्रभाकर कंपनी क्रमांक-१० चा प्रभारी असून, गडचिरोली विभागीय कमिटी आणि वेस्ट सब-झोनल ब्युरोचा प्रमुख होता. त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले गेले होते. मोहिमेत पोलिसांनी संयम, धैर्य आणि अचूक नियोजन यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवली, तरीही एक पोलीस जवान शहीद झाला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.