मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. या निवडणुकीसाठी उबाठाच्यावतीने उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा उबाठाच्यावतीने करण्यात आली असली तरी काँग्रेसच्यावतीनेही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजप आणि शिवसेना महायुतीचा महापौर होणार हे निश्चित झालेले आहे. मात्र, महापौर पदाचा चेहरा अद्यापही जाहीर झालेला नसून येत्या शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याने भाजपच्यावतीने चर्चेत असलेल्या राजेश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर आणि प्रिती सातम यांच्यापैंकी कुणाचा नंबर लागतो की या नावाव्यतिरिक्त दुसरेच नाव जाहीर केले जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे महापौर पदासाठी भाजपच्यावतीने कुणाचे नाव जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महापौरपद भाजपला जाणार असल्याने उपमहापौरपद हे शिवसेनेकडे जाणार आहे. या उपमहापौरपदासाठी ज्येष्ठ नेत्या तृष्णा विश्वासराव आणि माजी आमदार नगरसेविका यामिनी जाधव यांचे नाव माध्यमांनी चर्चेत आणले आहे. परंतु या दोन्ही नगरसेविका आक्रमक असल्याने सभागृहात त्यांची गरज आहे. त्यांच्यासारख्या आक्रमक नगरसेविकांना तोंड गप्प ठेवून उपमहापौरपदी बसवणे हे योग्य नसल्याने यापदावर दुसऱ्यांदा निवडून आलेल्या समृध्दी काते, शैला लांडे किंवा सगुण नाईक यांच्या नावाचा विचार होवू शकतो.
दरम्यान, उबाठाने महापौर आणि उपमहापौरदासाठी पक्षाच्यावतीने उमेदवार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उबाठाच्यावतीने महापौर आणि उपमहापौर पदासाठी कुणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, काँग्रेसच्या बळावर महापौर आणि उपमहापौरदाची निवडणूक लढवण्याची रणनिती आखणाऱ्या काँग्रेस पक्षानेही या दोन्ही पदांसाठी आपला उमेदवार देण्याची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. या पदांसाठी आपला उमेदवार द्यावा की नाही याबाबत या पक्षात चाचपणी सुरु आहे. त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत शनिवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन २०१७ मध्ये काँग्रेसच्या वतीने विठ्ठल लोकरे यांना महापौर पदासाठी आणि विनी डिसोझा यांना उपमहापौर पदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले होते.त्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार न दिल्यामुळे किशोरी पेडणेकर यांची महापौर पदी बिनविरोध निवड झाली होती. तसेच ऍड .सुहास वाडकर यांचीही उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाली होती.