मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२ तासांनंतरही पूर्णपणे सुटलेला नाही. खंडाळा घाटातील अडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन गॅसचा टँकर उलटल्याने झालेल्या भीषण गॅस गळतीमुळे हा महामार्ग अक्षरशः ठप्प झाला. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवल्याने प्रवाशांना रात्रभर अन्न-पाण्याविना महामार्गावरच ताटकळत राहावे लागले.
नेमकी घटना काय?
मंगळवारी सायंकाळी वेगात असलेला गॅस टँकर अडोशी बोगद्याजवळील उतारावर नियंत्रण सुटल्याने उलटला. टँकरमधील 'प्रोपिलीन' हा गॅस अत्यंत ज्वलनशील आणि वजनाने जड असल्याने तो परिसरात पसरू लागला. कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची भीती असल्याने प्रशासनाने तातडीने २५ किमीचा परिसर हाय अलर्टवर ठेवला आणि वाहनांची हालचाल पूर्णपणे रोखली. हजारो प्रवासी, ज्यात लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश होता, ते अन्न, पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधेविना १२-१२ तास रस्त्यावर अडकून पडले होते. सोशल मीडियावर अनेकांनी आपला संताप व्यक्त करत एक्सप्रेसवेची अवस्था 'पार्किंग लॉट' सारखी झाल्याचे म्हटले. काही प्रवाशांनी गाडीत बसून कंटाळल्यामुळे चक्क महामार्गावरच बसणे किंवा झोपणे पसंत केले.
महापौरांना इनोव्हा, तर समिती अध्यक्षांना भगव्या पट्यांच्या स्कॉर्पिओ सचिन धानजी मुंबई : मुंबईच्या महापौर तसेच उपमहापौर पदासाठी येत्या बुधवारी ११ ...
सध्या स्थिती काय ?
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन NDRF, महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने थोडासा निष्काळजीपणाही मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकला असता, त्यामुळे अत्यंत सावधगिरीने टँकर रिकामे करण्याचे काम सुरू होते. मध्यरात्री १२:३० ते १ वाजेच्या सुमारास पोलिसांना एक मार्गिका (Lane) सुरू करण्यात यश आले, ज्यामुळे अडकलेली वाहने हळूहळू पुढे सरकू लागली. मात्र, पूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी बुधवारची सकाळ उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस आणि बचाव पथकाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून गॅस गळती रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. प्रवाशांना सध्या या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांचा संताप
अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र उलटलेला टँकर हटवणे आणि गॅस गळती सुरक्षितरीत्या रोखणे हे अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानात्मक ठरले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून मध्यरात्री एनडीआरएफ (NDRF) च्या तुकड्याही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या होत्या. खोपोलीजवळ अडकलेल्या एका वसई-पुणे एसटी बसच्या चालकाने सांगितले की, "सुरुवातीला पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ होती, पण नंतर चार तासांहून अधिक काळ आम्ही एकाच जागी उभे आहोत; ही कोंडी साधारण २५ किमीपर्यंत असावी." चेंबूरहून शिवनेरी बसने प्रवास करणारे भगतसिंग शेळके यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, "प्रवास सुरू करताना आम्हाला या कोंडीची कल्पना नव्हती, पण बसमध्ये असताना सोशल मीडियावरील पोस्ट पाहून परिस्थिती किती गंभीर आहे हे उमजले. मध्यरात्र उलटून गेली तरी आम्ही रस्त्यावरच अडकलो होतो." महामार्ग सुरक्षा पथकाच्या (HSP) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील आणि वजनाने जड असल्याने कोणताही धोका पत्करता येणार नव्हता. हे मदतकार्य पूर्ण होऊन रस्ता मोकळा व्हायला पहाटेचे ४ वाजतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.