Monday, February 2, 2026

तिरुवनंतपुरममध्ये आज भारत-न्यूझीलंड मालिकेचा समाराेप

तिरुवनंतपुरममध्ये आज  भारत-न्यूझीलंड मालिकेचा समाराेप

होम ग्राऊंडवर संजूसाठी शेवटची संधी? इशानच्या एन्ट्रीने वाढला दबाव

तिरुवनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने ही मालिका वर्ल्ड कपच्या तयारीसाठी महत्त्वाची मानली असली तरी, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसाठी हा सामना अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. संजू आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असला, तरी त्याच्या खराब फॉर्ममुळे 'प्लेइंग इलेव्हन'मधील त्याच्या स्थानावर टांगती तलवार आहे.

चौथ्या सामन्याला मुकलेला इशान किशन पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसत असून तो सरावासाठी मैदानात उतरला आहे. फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "इशान खेळण्याची शक्यता जास्त आहे, मात्र अंतिम निर्णय फिजिओ घेतील." इशानच्या पुनरागमनामुळे संजू सॅमसनला संघातून डच्चू मिळणार की संघ व्यवस्थापन त्याला घरच्या मैदानावर शेवटची संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजू सॅमसन या मालिकेतील चारही सामन्यांत अपयशी ठरला आहे. वर्ल्ड कपपूर्वी फॉर्म मिळवण्यासाठी ही मालिका सुवर्णसंधी होती, मात्र संजूला त्याचा फायदा उठवता आला नाही. "खेळाडूंना अधिक संधी देणे गरजेचे आहे, मात्र वर्ल्ड कपमध्ये जाताना आत्मविश्वास आणि फॉर्म दोन्ही महत्त्वाचे आहेत," असे म्हणत कोटक यांनी संजूच्या कामगिरीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.

प्रशिक्षक कोटक यांनी तरुण फलंदाज अभिषेक शर्माचे विशेष कौतुक केले. अभिषेकने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात मोठी सुधारणा केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू अपयशी ठरलेला दिसतो आहे. त्याला मागील चार सामन्यांत १०, ६, ०, २४ अशाच धावा करता आल्या आहेत. संजू सॅमसनचा फॉर्मवर विचारलेल्या प्रश्नावर कोटक म्हणाले, त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या धावा सध्या दिसत नाही. त्याला त्याची स्पेस, मोकळीस देण्याचे आमचे काम आहे.

सामन्यापूर्वी खेळाडूंनी मंदिरात टेकवला माथा निर्णायक सामना ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडू तिरुवनंतपुरममधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचाही समावेश होता. खेळाडू मंदिरात पोहोचल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडूंनी दर्शनासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याचे पाहायला मिळते.

जसप्रीत बुमराहला विश्रांती भारताने ही मालिका ३-१ अशी आधीच जिंकली आहे आणि त्यामुळे पाचव्या सामन्यात काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांना आजच्या लढतीत विश्रांती दिल्यास आश्चर्य वाटायला नको. तिसऱ्या सामन्यातही त्यांना विश्रांती दिली गेली होती. संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळेल हे निश्चित आहे.

Comments
Add Comment