रोहा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावालगत असलेल्या बेलवाडी शेजारील रानात ही घटना २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. घरगुती वापरासाठी जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी गेलेली ही विधवा महिला एकटी असल्याची संधी साधून त्याच गावातील एका इसमाने तिचा विनयभंग केला. ग्रामीण भागात महिलांना दैनंदिन कामासाठीही सुरक्षितता नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पीडित महिला रानात लाकडी फाटे गोळा करत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने अचानक तिचा हात पकडत “तुझा नवरा मेला आहे, मग तुझं कसं काय?” असे अत्यंत नीच, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर आरोपीने जबरदस्तीने महिलेला जवळ ओढून तिच्या स्त्रीसन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचवणारे कृत्य केले. या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरून गेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक १७/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
या घटनेनंतर नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.