कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन मांडण्यासाठी 'अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदे'ची (आयडब्ल्यूडीसी) तिसरी बैठक शुक्रवारी कोची, केरळ येथे आयोजित करण्यात येणार आहे.
दिवसभर चालणाऱ्या या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल भूषवतील. या बैठकीला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्यासह विविध राज्य सरकारांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश नारायण राणे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बैठकीदरम्यान बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री विविध राज्यांमध्ये अंतर्देशीय जल वाहतुकीच्या अधिक विकासासाठी नवीन उपक्रमांचा शुभारंभ करतील. अनेक राज्य समर्थन करारांवर स्वाक्षरी होण्याचीदेखील शक्यता आहे, ज्यामुळे अंतर्देशीय जल वाहतूक प्रकल्पांसाठी केंद्र-राज्य सहकार्य अधिक बळकट होईल. 'आयडब्ल्यूडीसी ३.०'च्या अजेंड्यामध्ये नागरी जलवाहतूक प्रणाली अधिक बळकट करणे, मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढवणे, प्रवासी वाहतुकीसाठी हरित नौकांना (ग्रीन वेसल्स) प्रोत्साहन देणे, नदी क्रूझ पर्यटनाला चालना देणे आणि डिजिटल व शाश्वत (सस्टेनेबल) पद्धती लागू करणे यांवरील सत्रांचा समावेश आहे. या बैठकीत अंतर्देशीय जलमार्गांशी संबंधित नियामक आराखड्याचा आढावा घेतला जाईल आणि चालू असलेल्या व प्रस्तावित अंतर्देशीय जलवाहतूक प्रकल्पांशी संबंधित राज्यांच्या सूचनांवरही चर्चा केली जाईल.
भारतात अंतर्देशीय जलमार्गांचे एक व्यापक जाळे आहे, ज्याद्वारे दरवर्षी १४५ दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतूक (कार्गो) केली जाते. यामुळे हा वाहतुकीचा एक इंधन-कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल असा पर्याय ठरतो. अंतर्देशीय जलमार्ग हे अत्यधिक भार असलेल्या रेल्वे आणि रस्ते जाळ्याला पूरक ठरत असून, रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) वाहन वाहतूक आणि नदी क्रूझ पर्यटनासारख्या उपक्रमांनाही सुविधा प्रदान करते. २३ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या एकूण १११ राष्ट्रीय जलमार्गांपैकी ३२ जलमार्ग सध्या मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी कार्यान्वित आहेत. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत 'भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणा'कडे (आयडब्ल्यूएआय) या जलमार्गांचा विकास, देखभाल आणि नियमन करण्याची प्रमुख जबाबदारी आहे. राष्ट्रीय जलमार्गावरील मालवाहतूक २०१३-१४ मधील १८ दशलक्ष टनांवरून वाढून २०२४-२५ मध्ये १४५.८४ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली, तर प्रवासी वाहतूक २०२४-२५ मध्ये ७.६४ कोटींपर्यंत वाढली आहे.