मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या मलबार हिल विधानसभेत येणाऱ्या पाचच्या पाच वॉर्डमध्ये कमळ फुलवण्यात मंत्री लोढा यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी मतदार संघातल्या विविध भागात जल्लोष केला. आतापर्यंत जनतेच्या केलेल्या सेवेचीच ही पावती असल्याची प्रतिक्रिया मंत्री लोढा यांनी दिली आहे.
मलबार हिल विधानसभेच्या वॉर्ड क्र. २१४ मधून भाजपचे श्री. अजय पाटील यांनी मनसेच्या श्री. मुकेश भालेराव यांचा तब्बल ८३७१ मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक २१५ मधून भाजपाचे श्री. संतोष ढाले यांनी उबाठाचे श्री. किरण बाळसराफ यांचा २८११ मतांनी पराभव केला. ताडदेव परिसरातील वॉर्ड क्रमांक २१७ मधून भाजपाचे उमेदवार श्री. गौरांग झवेरी यांनी मनसेचे उमेदवार श्री. निलेश शिरधनकर यांच्यावर ८८५७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. गिरगाव परिसरातील वॉर्ड क्रमांक २१८ मधील भाजपच्या उमेदवार श्रीमती स्नेहल तेंडुलकर यांनी उबाठाच्या श्रीमती. गीता अहिरेकर यांचा ७८४९ मतांनी पराभव केला. तर महालक्ष्मी परिसरातील वॉर्ड क्रमांक २१९ चे भाजप उमेदवार श्री. सन्नी सानप यांनी उबाठाचे श्री. राजेंद्र गायकवाड यांना ७५०० पेक्षा जास्त मतांनी धूळ चारली.
विजयाचा आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, मुंबई मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या आणि महायुतीच्या विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात धावणाऱ्या विकासाच्या वेगवान डबल इंजिनला आता तिसऱ्या इंजिनची साथ मिळणार आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या व्हिजन प्रमाणे आता मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य केले जाईल हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. विरोधकांनी कितीही फेक नॅरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला असला तरी, जनतेने विकासालाच कौल दिल्याचा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला.