सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास मोबदला देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये कुत्र्यांचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कुत्र्यांच्या चाव्यामुळे कोणतीही व्यक्ती जखमी झाली किंवा मृत्यू झाली, तर राज्य सरकारला मोबदला द्यावा लागेल. न्या. विक्रम नाथ यांनी श्वानप्रेमींना जबाबदार मानले आहे. तसेच कोर्टाने असा सल्ला दिला की, भटके कुत्रे भुंकून, चावा घेऊन दहशत पसरवतात. त्यामुळे ज्यांना श्वानांचे खूप प्रेम वाटते त्यांनी भटक्या कुत्र्यांना आपल्या घरी न्यावे असे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी अॅड. मेनका गुरुस्वामी यांनी यावेळी युक्तिवाद केला की, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा संवेदनशील विषय आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, ही संवेदनशीलता फक्त कुत्र्यांसाठी दाखवली जाते. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सुप्रीम कोर्टाने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस स्टँड, क्रीडा संकुल आणि रेल्वे स्थानकांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा आदेश दिला होता. तसेच, सरकारी आणि सार्वजनिक स्थळांवर कुत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्देश दिला होता.