अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा सुरूच; बँकांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडसंदर्भातील कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम दिलासा सध्या तरी कायम ठेवण्यात आला आहे. कर्ज खाती ‘फसवी’ ठरवण्याच्या तीन राष्ट्रीयीकृत बँकांच्या कारवाईला दिलेली स्थगिती हटवावी, अशी मागणी करत बँकांनी दाखल केलेल्या आव्हानावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. मात्र अंतिम निर्णय न देता न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे.



हायकोर्टाने नेमकं काय नमूद केलं?


अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सविरोधात इंडियन ओव्हरसीज बँक, आयडीबीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी कर्ज खाती फसवी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.


मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २०२४ च्या मास्टर परिपत्रकानुसार असा अहवाल पात्र सनदी लेखापालाच्या (CA) स्वाक्षरीशिवाय ग्राह्य धरता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. संबंधित अहवालावर अधिकृत सीएची स्वाक्षरी नसल्याने त्यावर अवलंबून कारवाई करता येणार नाही, असे स्पष्ट करत २४ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने बँकांच्या कारवाईला स्थगिती दिली होती.


न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, अशा प्रकारे कर्ज खाते फसवी घोषित केल्यास त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. कंपनीला अनेक वर्षे कर्ज मिळू नये, कारवाईची शक्यता, रोजगारावर परिणाम आणि प्रतिष्ठेचे नुकसान यासारखे दूरगामी परिणाम होऊ शकतात.



वादाचा केंद्रबिंदू काय आहे?


अनिल अंबानी यांनी वैयक्तिकरित्या तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या वतीने बँकांनी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसांना आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बँकांनी नियुक्त केलेली बीडीओ एलएलपी ही संस्था लेखापरीक्षक नसून सल्लागार स्वरूपाची आहे, त्यामुळे तिचा अहवाल कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही, असा दावा अंबानी यांच्या याचिकेत करण्यात आला आहे.


याउलट, बँकांनी असा युक्तिवाद केला की, संबंधित लेखापरीक्षण २०१६ मधील आरबीआय परिपत्रकानुसार करण्यात आले असून बाह्य लेखापरीक्षकाची गरज नाही. मात्र हा युक्तिवाद न्यायालयाने प्राथमिक टप्प्यावर स्वीकारलेला नाही.



बँकांवर न्यायालयाची कठोर टिप्पणी


सुनावणीदरम्यान न्यायालयाने बँकांच्या विलंबावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१३ ते २०१७ या कालावधीतील व्यवहारांचे लेखापरीक्षण २०१९ मध्ये करण्याचा निर्णय घेतला, तोपर्यंत बँका काय करत होत्या? असा थेट सवाल खंडपीठाने उपस्थित केला.


तसेच, आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ पात्र सनदी लेखापालालाच अशा प्रकारच्या लेखापरीक्षणासाठी नेमण्याचा अधिकार असताना तो नियम कसा डावलला गेला, यावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. बीडीओ एलएलपीने यापूर्वीही कर्ज देणाऱ्या बँकांसाठी सल्लागार म्हणून काम केले असल्याने त्यांची स्वतंत्रता संशयाच्या भोवऱ्यात येते, असे निरीक्षणही नोंदवण्यात आले.



पुढे काय?


१४ जानेवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीत बँकांच्या आव्हानावर सविस्तर युक्तिवाद होणार असून, तोपर्यंत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सविरोधातील कडक कारवाईला न्यायालयीन संरक्षण मिळणार आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी