साताऱ्यात आनंदावर शोकाची छाया; लेकीच्या जन्मावेळीच सैनिक पित्याचा अपघाती मृत्यू

सातारा : नियतीचा खेळ कधी किती निर्दयी ठरेल, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेतून आला आहे. भारतीय सैन्यात सेवा बजावणारे जवान प्रमोद परशुराम जाधव हे काही दिवसांच्या रजेवर गावी आले असताना भीषण अपघातात दगावले. विशेष बाब म्हणजे, ज्या क्षणी त्यांच्या घरात नव्या जीवाच्या आगमनाची तयारी सुरू होती, त्याच वेळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.


सातारा तालुक्यातील दरे गावचे रहिवासी असलेले प्रमोद जाधव सैन्य दलात कार्यरत होते. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते काही दिवसांपूर्वीच रजा घेऊन गावी आले होते. आईचे छत्र आधीच हरपलेले असल्याने, पत्नीच्या या महत्त्वाच्या काळात तिच्या सोबत राहण्याचा त्यांचा निर्धार होता.


शनिवारी सकाळच्या सुमारास काही वैयक्तिक कामासाठी प्रमोद जाधव दुचाकीवरून जात असताना, वाढे फाट्याजवळ एका मालवाहू वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.


या दुर्घटनेने संपूर्ण दरे गाव शोकसागरात बुडाले. सर्वात हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे, प्रमोद यांचे पार्थिव गावी आणले जात असतानाच त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. एका बाजूला नव्या आयुष्याचे स्वागत, तर दुसऱ्या बाजूला घरच्या कर्त्या व्यक्तीचा अंत या घटनेमुळे प्रत्येकाचे डोळे पाणावले. जन्माच्या काही तासांतच त्या चिमुकलीला आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घ्यावे लागले. पित्याच्या छायेशिवाय सुरू झालेलं तिचं आयुष्य अनेकांना सुन्न करून गेलं.


शनिवारी दुपारी दरे गावात प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यविधीच्या वेळी जेव्हा त्यांच्या पत्नीला आणि नवजात बालिकेला तिथे आणण्यात आले, तेव्हा उपस्थित प्रत्येकाचा संयम ढासळला. प्रमोद जाधव यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि नवजात कन्या असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार