Pune Highway News : पुणेकरांसाठी नववर्षाची मोठी भेट! ६ पदरी उड्डाणपूल अन् २४ किमीचा उन्नत मार्ग; 'या' भागांचा होणार कायापालट

पुणे : पुणे शहर आणि परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या नागरिकांसाठी २०२६ हे वर्ष 'दिलासादायक' ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) पुणे जिल्ह्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये या प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती आणि आता प्रत्यक्ष जमिनीवर कामाला सुरुवात झाल्याने पुणेकरांच्या प्रवासाचा वेग वाढणार आहे. पुणे शहराच्या अंतर्गत भागात आणि उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहनांचा प्रचंड ताण लक्षात घेऊन हे दोन प्रकल्प आराखड्यात समाविष्ट करण्यात आले होते. MSIDC तर्फे राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे पुण्यातील महत्त्वाचे जंक्शन्स आणि कनेक्टिव्हिटी पॉईंट्स सुलभ होणार आहेत. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच शहराबाहेर जाणारा प्रवासही कमी वेळेत पूर्ण होईल. २०२५ हे वर्ष या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया आणि मंजुरीमध्ये गेले. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व तांत्रिक अडथळे दूर करून प्रत्यक्ष यंत्रणा कामाला लागली आहे. हे दोन्ही मार्ग पुण्यातील दळणवळणाच्या दृष्टीने 'लाईफलाईन' ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या कामाच्या नियोजित वेळापत्रकामुळे आगामी काळात पुणेकरांना खड्डेमुक्त आणि सिग्नलमुक्त प्रवासाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.



हडपसर ते यवत प्रवासाचे चित्र बदलणार!


नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मंजुरीनंतर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन मेगा प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे. तब्बल ५,२६२ कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हडपसर-यवत उड्डाणपूल पुणे-सोलापूर हायवेवरील कोंडी कायमची संपवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हडपसरमधील भैरोबा नाळा ते यवत दरम्यान होणाऱ्या या सहा पदरी उड्डाणपुलामुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक आता विनाअडथळा पार पडणार आहे. जून २०२५ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती, मात्र आता त्याच्या लांबीत सुमारे ४.५ किलोमीटरची वाढ करण्यात आल्याने हा मार्ग अधिक सुटसुटीत होणार आहे. या विस्तारामुळे स्थानिक वाहतूक आणि हायवेची लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी होऊन प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येईल.



तळेगाव-चाकण-शिक्रापूर: ५४८-डी महामार्गाचा कायापालट


पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी) च्या बांधकामालाही याच वर्षात मुहूर्त मिळणार आहे. एकूण ५३.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम दोन टप्प्यांत केले जाईल. विशेष म्हणजे, यातील २४.२ किलोमीटरचा रस्ता हा 'एलिव्हेटेड' (उन्नत) मार्ग असणार आहे, ज्यामुळे चाकण परिसरातील अवजड मालवाहतुकीचा आणि कामगारांच्या प्रवासाचा प्रश्न सुटेल. हे दोन्ही प्रकल्प केवळ रस्ते नसून पुण्याच्या आर्थिक विकासाचे महामार्ग ठरणार आहेत. हडपसर-यवत पुलामुळे सोलापूर-पुणे कनेक्टिव्हिटी सुधारेल, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग हा ऑटोमोबाईल आणि लॉजिस्टिक हबला मोठी चालना देईल. या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून, पुढील काही वर्षांत पुणेकरांना वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.



'या' कंपनीकडे सोपवली जबाबदारी


या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांच्या बांधकामासाठी 'मोंटेकार्लो लिमिटेड' या नामांकित कंपनीची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर पात्र ठरल्यानंतर या कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल आणि कंत्राटाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मंत्रालयातून हिरवा कंदील मिळताच यंत्रसामग्री आणि कामगार प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दाखल होतील. MSIDC मधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांच्या आत हडपसर–यवत आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर या दोन्ही मार्गांचे काम सुरू होण्याचे दाट संकेत आहेत.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या