मुंबई : भटक्या कुत्र्यांवरील कारवाईच्या विरोधात रविवारी, (४ जानेवारी) देशभरात पुकारण्यात आलेल्या ‘करा किंवा मरा’ आंदोलनात मुंबईतील प्राणीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अंधेरी परिसरात सुमारे दोन किलोमीटर लांबीची रॅली काढण्यात आली असून, हजारो प्राणीप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते या निषेधात सहभागी झाले होते. यावेळी “प्राण्यांवर क्रूरता थांबवा”, “मानवी आणि प्राणी सहअस्तित्व हवे” अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनकर्त्यांनी येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. सरकार आणि प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तसेच प्राणी आणि प्राणीप्रेमींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरूच राहिल्या, तर स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात सहभागी झालेले प्राणी हक्क सल्लागार रोशन पाठक यांनी सांगितले की, देशभरातील प्राणीप्रेमींनी लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “जोपर्यंत प्राण्यांसाठी योग्य कायदे, मानवी धोरणे आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असे ते म्हणाले.या आंदोलनामागील वादाचे मूळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाशी संबंधित आहे. न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना उचलून नियुक्त आश्रयस्थानांमध्ये नेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, प्राणीप्रेमी या निर्णयाला विरोध करत असून, नसबंदी व लसीकरणाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवले असते तर मानव आणि प्राणी शांततेत एकत्र राहू शकले असते, असे त्यांचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनंतरही स्थानिक प्रशासनाने प्राण्यांसाठी अधिकृत फीडिंग स्पॉट्स उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे प्राणी खाऊ घालणाऱ्या नागरिकांना सतत त्रास व धमक्या दिल्या जात आहेत. कायद्याने परवानगी असूनही, फीडर्स व रेस्क्यू करणाऱ्यांना बेकायदेशीरपणे अडवले जाते व अपमानास्पद वागणूक दिली जाते, असे पाठक यांनी सांगितले.