संमेलनस्थळी उडाली खळबळ
सातारा : मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्याच्या हातात कोयत्यासारखी शस्त्रं होती, असा गंभीर आरोप विनोद कुलकर्णीं यांनी केला. हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव संदीप जाधव असे असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे संमेलनस्थळी एकच खळबळ उडाली.
सातारा शहरात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी संदीप जाधव हा तरुण कार्यक्रमस्थळी आला होता. आल्यानंतर त्याने संमलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासले. त्यानंतर ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली. तसेच राष्ट्रगीतही म्हटले.
विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, "मी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन कार्यक्रम करून कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत होतो. यावेळी अज्ञात व्यक्तीने माझ्या डोळ्यात काळा पदार्थ टाकला. त्यांच्याकडे कोयत्यासारखी शस्त्रही होती. तुला संपवतो अशी भाषाही यावेळी हल्लेखोराने वापरली. यावेळी काळा काही तरी डोळ्यात गेल्याने मला काहीही दिसले नाही. उपचार घेऊन मी पुन्हा संमेलनस्थळी दाखल झालो आहे."
दरम्यान या प्रकाराचा कुलकर्णी यांनी निषेध केला. किती लोक होते ते माहिती नाही, मी त्यांना ओळखत नाही. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जात आहे. ते म्हणाले, साहित्यिक संस्थेत राजकीय हस्तक्षेप नको ही माझी भूमिका ठाम आहे. मी साहित्य सेवेसाठी काम करतो आहे. विचाराची लढाई विचाराने करावी. या कार्यकर्त्याने यापूर्वीही वेगवेगळ्या घटनेत अशा प्रकारचे कृत्य केले आहे. पोलिस पकडण्यासाठी येताच जण गण मन म्हणण्याची त्याची पद्धत आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात पोलिसांना मर्यादा येतात असेही सांगितले.
पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करून न्याय देतील
"मी सरकारविरोधात, हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. आमच्या सरकार व वेगवेगळ्या संघटनांविरोधात मराठी भाषेसाठी लढाया सुरू आहेत. कोणत्या कारणातून माझ्यावर हल्ला झाला हे मला समजून आलेले नाही," असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. हल्ला केला की कोणी करायला लावला आहे हे माहिती नाही. पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करून मला न्याय देतील, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
अत्यंत दुर्दैवी प्रकार : नरेंद्र पाठक
साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नरेंद्र पाठक यांनी सांगितले की, "विनोद कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट केले. साहित्य चळवळीमध्ये विनोद कुलकर्णी यांचे योगदान मोठे आहे. अशा प्रकारचे साहित्य संमेलनाचे कार्यक्रम घेणे सोपे नाही. अशा प्रकारचा हल्ला होणे दुर्दैवी आहे."