“पत्राचाळीत मराठी माणसाला कुणी देशोधडीला लावलं?”
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांचा उल्लेख 'पोपटलाल' असा केला. "संजय राऊत हे स्वतः पोपटलाल आहेत. त्यांना मुंबईत 'खान' महापौर करायचा आहे का? त्यांनी आपला धर्म सोडला आहे, पण मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान स्वर्गीय दिघे साहेबांची परंपरा पुढे नेत रक्तदाते आणि डॉक्टरांचा केला ...
मराठी माणसाचा अपमान कुणी केला?
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला घेरताना नवनाथ बन म्हणाले, "मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी कुणी मारली याचे उत्तर द्या. पत्राचाळीत काय झाले? तिथल्या मराठी माणसाला परागंदा कुणी केले? उलट देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांनी मराठी माणसाला आहे त्या ठिकाणी घरं देण्याचं काम केलं आहे. तुम्ही पत्राचाळीसाठी जेलमध्ये गेलात, हे विसरू नका." ज्या काँग्रेसने मराठी माणसावर गोळ्या घातल्या, त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, त्याबद्दल आधी माफी मागा, असेही ते म्हणाले.
‘वापरा आणि फेकून द्या’ हीच तुमची नीती
उबाठा गटातील निष्ठावंतांच्या परिस्थितीवर भाष्य करताना बन यांनी गंभीर आरोप केले. "मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानास्पद वागणूक कुणी दिली? डिरंगे भाऊ रडत होते, फायर ब्रँड आजींचे म्हणणेही तुम्ही ऐकून घेतले नाही. वापरा आणि फेकून द्या हीच तुमची नीती आहे. संजय राऊत यांची निष्ठा आता उद्धव ठाकरेंकडे नसून राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडे आहे, कारण त्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे आता त्यांना खासदारकी देऊ शकत नाहीत," असा टोला त्यांनी लगावला.
वचननामा नाही, तर ‘नाटकनामा’!
उबाठा गटाने जाहीर केलेल्या वचननाम्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, "हा वचननामा नसून 'नाटकनामा' आहे. तुमची पार्टी ड्रामेबाज आहे. तुम्ही फक्त फुकटची आश्वासने दिली, पण 'देवाभाऊ' जे वचन देतात ते पूर्ण करून दाखवतात." तसेच, उबाठा गट एबी फॉर्मसोबत १५ कोटी रुपये देत असल्याचा खळबळजनक दावा करत निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
स्टार प्रचारकांवरून टोला
"छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला विरोध करणारे राशिद बाबू, औरंगजेब फॅन क्लब आणि इक्बाल मुल्ला हे तुमचे स्टार प्रचारक आहेत, तर आमचे स्टार प्रचारक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत," असे म्हणत त्यांनी निवडणुकीतील वैचारिक फरक स्पष्ट केला. पूजा मोरे यांचे हृदयपरिवर्तन झाले असून त्या मोदींच्या विचारांशी जोडल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.






