नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्पष्ट केले आहे की, हा स्फोट कोणताही आकस्मिक प्रकार नसून, गेल्या दोन वर्षांपासून रचल्या गेलेल्या एका मोठ्या दहशतवादी कटाचा भाग होता. फॉरेन्सिक तपासात या स्फोटात तब्बल ४० किलो हाय-ग्रेड स्फोटकांचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासातून असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी उमर नबी आणि त्याच्या साथीदारांनी २०२३ मध्येच या हल्ल्याची आखणी केली होती. सुरुवातीला दहशतवाद्यांचा पहिला निशाणा जम्मू-काश्मीर होता. मात्र, जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा देशाची राजधानी दिल्लीकडे वळवला.
घटनास्थळी तपास करणाऱ्या फॉरेन्सिक पथकाला अमोनियम नायट्रेट आणि ट्राइऐसीटॉन ट्राइपेरोक्साइड (टीएटीपी) या अतिशय घातक व संवेदनशील रसायनांचे अंश आढळून आले आहेत. अमोनियम नायट्रेटचा वापर खत म्हणून होत असला, तरी मोठ्या प्रमाणात स्फोट घडवण्यासाठी ते अत्यंत प्रभावी ठरते. टीएटीपी हे अत्यंत दुर्मिळ व स्फोटक केमिकल असून त्याच्या विक्री व वाहतुकीवर कडक निर्बंध आहेत.
एनआयएच्या सूत्रांनुसार, आरोपींनी हरियाणातील सोहना, गुडगाव आणि नूह येथील स्थानिक दुकानांमधून अमोनियम नायट्रेट आणि खतांचा मोठा साठा जमवला होता. याआधी फरीदाबादच्या धौज गावातून एका आरोपीच्या घरातून ३५८ किलो स्फोटक साठा जप्त करण्यात आला होता. या साठ्याचा थेट संबंध या कार स्फोट प्रकरणाशी जोडला जात आहे.
दहशतवादी कटात सामील असल्याच्या संशयावरून आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने यातील ७ मुख्य आरोपींच्या न्यायिक कोठडीत ८ जानेवारी २०२६ पर्यंत वाढ केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपींमध्ये काही डॉक्टर आणि मौलवींचा समावेश असल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. न्यायिक कोठडीत पाठवण्यात आलेल्या आरोपींमध्ये डॉ. अदील राथर, डॉ. मुजम्मिल गनई, डॉ. शाहीन सईद, मौलवी इरफान अहमद वागे, जासिर बिलाल वानी, आमिर राशिद अली आणि सोयब यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पातळीवर सुरू असून, देशातील सुरक्षेच्या दृष्टीने हा कट किती दूरवर पसरलेला होता, याचा शोध घेण्याचे काम एनआयएकडून सुरू आहे.