शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी
नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने जिंकत एकतर्फी मालिका विजय नोंदवला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांसह शफाली वर्माने वादळी कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शफाली वर्मा अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेच्या संघाला एकटीच भारी पडली. यासह पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने ३-० च्या फरकाने जिंकली आहे.
दोन सामने विशाखापट्टणममध्ये खेळवल्यानंतर तिसरा सामना तिरुअनंतपुरम खेळवला गेला व या सामन्यातही भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला. हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यासह श्रीलंकेचा संघ ११२ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १३.२ षटकांत सामना जिंकला.
श्रीलंकेने दिलेल्या ११३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती-शफाली फलंदाजीला उतरल्या. स्मृती मानधना तिसऱ्या सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली व १ धाव करत पायचीत होत बाद झाली. तर शफाली वर्माने गेल्या सामन्यातील फॉर्म कायम ठेवत २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जेमिमा रॉड्रीग्ज ९ धावा करत बाद झाली. शफाली वर्माने या सामन्यात ४२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७९ धावांची वादळी खेळी केली. शफाली वर्माला कर्णधार हरमनप्रीत कौरने चांगली साथ दिली. हरमनप्रीतने २१ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाने दणदणीत विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने सुरुवात चांगली केली, पण मोठी धावसंख्या पुन्हा एकदा अपयशी ठरली. कर्णधार चमारी अट्टापटू लवकर बाद झाली. तर हसीनी परेराने २५ धावांची चांगली खेळी केली. तर इमेशा दुलानी २७ व कविशा दिल्हारी यांनी २० धावांची खेळी केली. कौशिनीने १९ धावांचे योगदान दिले. एकही खेळाडू अर्धशतक करू शकला. तर भारताकडून रेणुका सिंग ठाकूर व दीप्ती शर्माने उत्कृष्ट
गोलंदाजी केली. रेणुका सिंगने ४ षटकांत २१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या. यासह दीप्ती शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५१ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.