सिंधुदुर्ग : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले आहे. मालवणमधील विजयाचा आनंद साजरा करत असतानाच, आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. "ठाकरे गटाकडे कोणताही अजेंडा किंवा व्हिजन नव्हते, त्यामुळे त्यांचा पराभव निश्चितच होता," अशा शब्दांत राणेंनी विरोधकांचा समाचार घेतला. नेतृत्वाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजीमुळे ठाकरे गटाला अपयश आलेलं आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे हा विजय मिळाला आहे. पाच वर्षे केवळ जल्लोष न करता शहराच्या विकासासाठी काम करणार; असे शिवसेना आमदार निलेश राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आमदार निलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या अपयशाचे विश्लेषण करताना सांगितले की, त्यांच्याकडे निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही प्लॅन नव्हता. कार्यकर्ते सोडून जात आहेत आणि एकसंघपणे लढण्याची क्षमता त्यांच्यात उरली नाही, म्हणूनच त्यांना या निवडणुकीत हार पत्करावी लागली.
"एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू"
मालवणमधील विजयाबद्दल बोलताना राणे भावूक झाले. ते म्हणाले, "आज विचित्र भावना आहेत. मालवणमध्ये जनतेने दिलेला कौल सुखावह आहे, पण कणकवलीमध्ये आमच्या जवळच्या लोकांचा पराभव झाला आहे, त्याचे दुःखही आहे. राजकारणात निवडणूक एका बाजूला आणि नाती एका बाजूला असतात. कणकवलीत आमचे कुटुंबच आमनेसामने होते." विजय मिळवलेल्या संदेश पारकर यांचे त्यांनी अभिनंदनही केले.
पैसे वाटपाच्या आरोपांना उत्तर
निवडणुकीत झालेल्या पैसे वाटपाच्या आरोपांवर बोलणे निलेश राणे यांनी टाळले. "आज विजयाचा दिवस आहे, तो आम्हाला आनंदाने साजरा करू द्या. आरोप-प्रत्यारोप गेल्या २५ दिवसांपासून सुरू आहेत, आजचा दिवस आमच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाचा आहे," असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
जबाबदारीची जाणीव
विजयाचा उन्माद न करता राणे यांनी भविष्यातील कामाची दिशा स्पष्ट केली. "जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे. पुढची पाच वर्षे लोकांना अपेक्षित असलेला शहराचा विकास करून दाखवण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.