चंदिगड : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५१ धावांनी मोठा पराभव केला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
भारताच्या फलंदाजीचा किल्ला अखेर गडगडला. एका टोकाकडून एकट्याने झुंज देणारा युवा फलंदाज तिलक वर्मा अखेरच्या विकेटच्या रूपात बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात विजय मिळवला.
भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी घरच्या मैदानावर डावाची सुरुवात केली. पण डावाच्या पाचव्याच चेंडूवर शुभमन गिलला रिझा हेंड्रिक्सच्या हातून लुंगी एनगिडीने शून्यावर बाद केले. त्याच्यानंतर अभिषेक शर्मालाही मार्को यान्सिनने बाद केले. त्याने २ षटकारांसह ८ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या षटकात कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने घेतलेला डीआरएस यशस्वी ठरला. त्याचा झेल यान्सिनच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकने घेतला. सूर्यकुमारने ५ धावा केल्या. त्यामुळे भारताची अवस्था ३२ धावांत ३ विकेट्स अशी झाली होती.
नंतर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या अक्षरला ८ व्या षटकात ओटनील बार्टमनने २१ धावांवर रिझा हेंड्रिक्सच्या हातून झेलबाद केले. नंतर आक्रमक खेळणाऱ्या तिलकला हार्दिक पांड्याने दुसऱ्या बाजूने साथ दिली. हार्दिकला लुथे सिपामलाने २३ चेंडूत २० धावांवर असताना माघारी धाडले. तिलकला साथ देण्यासाठी आलेल्या जितेशने आक्रमक खेळ केला. तिलकने अर्धशतकही पूर्ण केले. जितेशला १८ व्या षटकात लुथे सिपामलानेच १७ चेंडूत २७ धावांवर असताना बाद केले. त्याच्या पुढच्याच १९ व्या षटकात शिवम दुबेही १ धावेवर बाद झाला. त्यामुळे भारतासाठी विजयही दूर गेला होता. ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. पण तो त्यानंतर तो १९ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीही शून्यावर बाद झाला. १९ वे षटक ओटनील बार्टमनने टाकले होते. त्याने या षटकात तीन विकेट्स घेतल्या.
भारताची स्वैर गोलंदाजीनंतर फलंदाजी ढेपाळली ; मालिकेत १-१ ने बरोबरी
तिलक वर्माची एकाकी झुंज
सिक्सर किंग युवीसह हरमनप्रीतचा सन्मान! दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन युवराज सिंग आणि भारतीय महिला संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा गुरुवारी विशेष सन्मान करण्यात आला. मुल्लनपूर येथील महाराजा यादविन्द्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन क्रिकेटर्सच्या नावाच्या स्टँडचे अनावरण करण्यात आले.
डी कॉकचे विक्रमी अर्धशतक त्याने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ५० धावांचा टप्पा पार करण्याची ही १२ डावातील पाचवी वेळ होती. त्यामुळे त्याने निकोलस पूरन आणि जॉस बटलर यांची बरोबरी केली आहे. या दोघांनीही भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये पाचवेळा ५० धावांचा टप्पा पार केला आहे. पूरनने २० आणि बटलरने २४ डावात हा कारनामा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा डाव: २१३/४ (२० षटके) क्विंटन डी कॉकची तुफानी खेळी: दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने अप्रतिम फलंदाजी करत केवळ ४६ चेंडूंत ९० धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. भारतीय गोलंदाजी: भारताच्या गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले. शिवम दुबेने ३ षटकांत ५० धावा दिल्या, तर अर्शदीप सिंगने एकाच षटकात ७ वाईड चेंडू टाकले. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने भारताकडून सर्वाधिक २ बळी घेतले.
भारताचा डाव: १६२/१० (१९.१ षटके) खराब सुरुवात: २१४ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल (०), अभिषेक शर्मा (१७) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (५) स्वस्तात बाद झाले. तिलक वर्माची झुंज: एका बाजूने फलंदाज बाद होत असताना, युवा फलंदाज तिलक वर्माने एकहाती झुंज दिली आणि ३३ चेंडूत ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली.






