घोडबंदर मार्गावरील दुरुस्तीसाठी बदल
पालघर : ठाणे - घोडबंदर मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीचे नियोजन न केल्याने त्याचा फटका मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकीला बसला होता. महामार्गावर सलग पाच दिवस मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस यंत्रणा कोंडीत सापडली होती. आता पुन्हा एकदा ठाणे घोडबंदर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नवी मुंबई बाजूकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना १२ ते १४ डिसेंबर दरम्यान ठरावीक वेळेसाठी बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई - अहमदाबाद महामार्ग मुंबई आणि गुजरातसह इतर अनेक शहरांना जोडणारा आहे. त्यामुळे या महामार्गावरून दररोज मुंबई, ठाणे, पालघर, वसई - विरार, मिरा-भाईंदर, गुजरात यासह इतर भागात ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. दरम्यान, मुंबई - अहमदाबाद महामार्गावर ऑक्टोबर महिन्यात सलग पाच दिवस मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे महामार्गावर वाहनांचा अधिक ताण आला होता. १४ ते १५ तासांची कोंडी झाली होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची बस देखील यात अडकली होती.
तर चक्क पालकमंत्री देखील या कोंडीत अडकले होते. त्यांना मार्ग काढण्यासाठी विरुद्ध दिशेचा पर्याय घ्यावा लागला होता. रस्त्याच्या कामामुळे मुंबई - अहमदाबाद महामार्गावर आणि इतर रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा बाजूकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शि यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरात बाजूकडून घोडबंदर, ठाणे, मुंबई नवी मुंबई बाजूकडे जाणारी अवजड वाहतूक सकाळी ८ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ दरम्यान बंदी घातली आहे. या दरम्यान ढाबे, पेट्रोल पंप, तसेच सुरक्षित ठिकाणी वाहने पार्क करण्याची मुभा आहे.






