राज्यातील ४९ लाख जमिनी अधिकृत होणार

नागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करत मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरे आणि महानगर प्रदेशांतील अकृषिक झालेल्या जमिनींचे १९६५ ते २०२४ या कालावधीतील सर्व तुकडे विनाशुल्क नियमित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे ४९ लाख तुकडे एक पैसाही न भरता अधिकृत होणार असून, साधारण दोन कोटी नागरिकांना थेट मालकीहक्क मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत याबाबतचा अध्यादेश सादर केला. या अध्यादेशानुसार, शहरालगत आणि विकासक्षेत्रातील अकृषिक शेतजमिनींचे तुकडे पूर्णपणे मोफत नियमित होतील आणि खरेदीदारांचे नाव ७/१२ उताऱ्यावर मालक म्हणून नोंदले जाईल.


१९४७ च्या बॉम्बे तुकडे प्रतिबंध कायद्यामुळे (सध्याचा महाराष्ट्र कायदा) शेत जमिनीचे छोटे तुकडे करण्यास बंदी होती. मात्र शहरांच्या विस्ताराबरोबर या जमिनी रहिवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रात रूपांतरित झाल्या. लोकांनी त्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केल्या, विभागल्या; परंतु कायद्याच्या भीतीमुळे ७/१२ व ८-अ वर नावे नोंदली गेली नाहीत. परिणामी बँक कर्ज, बांधकाम परवानगी, पुनर्विक्री असे अनेक व्यवहार रखडले. लाखो कुटुंबांना दस्तऐवज असूनही मालकीहक्कापासून वंचित राहावे लागले. या कायद्यात यापूर्वी २०१५-१६ मध्ये कलम ८ब जोडले होते, मात्र त्याचा फायदा फक्त अधिकृत लेआऊटमधील प्लॉटधारकांनाच मिळाला. २०१७ मध्ये २५ टक्के तर २०२५ मध्ये ५ टक्के प्रीमियमची तरतूद करण्यात आली होती; तरी मोठ्या दंडामुळे बहुतांश नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली. आता नव्या अध्यादेशानुसार हे सर्व तुकडे ‘मानीव नियमित’ मानले जातील.

सर्वसामान्यांना फायदा काय होणार?


- १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीतील सर्व तुकडे शून्य टक्के दंडात म्हणजेच विनामूल्य नियमित.
- नोंदणीकृत खरेदीखत असल्यास थेट ७/१२ उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव मालक म्हणून नोंद.
- अनोंदणीकृत दस्त असल्यास आता सब-रजिस्ट्रारकडे नोंदणी करून ७/१२ वर नाव नोंदवता येईल.
- लेआऊटमधील प्लॉटधारकांचेही नाव मालकासह ७/१२ वर येईल; यामुळे दशकानुदशके चाललेला गोंधळ संपुष्टात येईल.

निर्णय कुठे-कुठे लागू होणार?


- सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत हद्द
- मुंबई (एमएमआरडीए), पुणे (पीएमआरडीए), नागपूर (एनएमआरडीए) महानगर प्रदेश
- विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्र
- एकसमान विकास नियंत्रण नियम अंतर्गत शहर-गावांच्या परिघीय नियोजन क्षेत्र
- मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील सर्व प्रमुख शहरी व उपनगरीय भागातील अकृषिक झालेल्या शेतजमिनींचा यात समावेश आहे.

दोन कोटी नागरिकांना कागदोपत्री मालकीहक्क मिळणार


या निर्णयामुळे सुमारे ४९ लाख जमिनींचे तुकडे अधिकृत होऊन अंदाजे दोन कोटी नागरिकांना कागदोपत्री मालकीहक्क मिळेल. बँकेकडे गहाण ठेवणे, बांधकाम परवानगी मिळवणे, वारसा हक्क निश्चित करणे आणि जमीन बाजारात विक्री करणे सोपे होईल. गेल्या सहा-सात दशकांपासून अडकलेले व्यवहार एका झटक्यात मार्गी लागतील. राज्यातील लाखो कुटुंबांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments

Anil Chavan    December 15, 2025 02:16 AM

हा कायदा व्हावा म्हणून आम्ही वाट पाहत होतो.मंत्री महोदयांनी आमच्या अडचणी सोडवल्या आहेत,त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

Add Comment

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :

Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण