उच्चाधिकार समितीचा निकाल
सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित न करता त्याला पकडून महाराष्ट्र वनविभागाने आपल्या अखत्यारित नैसर्गिक अधिवासात सोडावे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने दिला आहे.
समितीने दिलेल्या आदेशात अनेक निरीक्षणे नोंदविली असून, येत्या दोन आठवड्यांत हत्तीची वर्तणूक, आरोग्य अहवाल व तज्ज्ञांची मते विचारात घेऊन अंतिम निकाल देण्याचा निर्णय राखून ठेवला आहे. या निकालाने ओंकारप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात कोल्हापूर वनविभागाने न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीकडे पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
ओंकार हत्तीला वनताराकडे पाठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला होता. या संदर्भात सर्किट बेंचच्या निर्देशानुसार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने हा निर्णय रद्द करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा आदेश जारी केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ओंकारप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. वनविभाग गुजरात लॉबीला हाताशी धरून ओंकारला वनतारात विकण्याचा कट आखत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
असा आहे आदेश
‘ओंकार’ला पकडल्यानंतर महाराष्ट्रातील सुरक्षित व सरकारने व्यवस्थापित केलेल्या बचाव सुविधेत ठेवले जावे, या सुविधेत मूलभूत पायाभूत सुविधा, पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि २४ तास वनविभागाच्या पथकाचे निरीक्षण हे अनिवार्य आहे.