मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या फेरीसाठी पाच हजार ५५३ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी तीन हजार १९१ विद्यार्थी प्राधान्यक्रम व्यवस्थित भरलेच नसल्यामुळे अपात्र झाले. हे विद्यार्थी पहिल्याच फेरीतून बाहेर फेकले गेले. पहिल्या फेरीमध्ये बाद होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ५७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. उर्वरित दोन हजार ३६२ जणांपैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी वैद्यकशास्त्र, भूलशास्त्र आणि शल्यचिकित्साशास्त्र या विषयांना प्राधान्य दिले आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबवली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत पाच हजार ५५३ जणांपैकी फक्त दोन हजार ३६२ जण पात्र ठरले.
प्राधान्यक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी २६३ विद्यार्थ्यांनी वैद्यकशास्त्र, २४० विद्यार्थ्यांनी भूलशास्त्र तर २३० विद्यार्थ्यांनी शल्यचिकित्साशास्त्र शाखांची निवड केली आहे. स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र या शाखेसाठी १९० विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. तसेच रेडिओलॉजी शास्त्राला १२३ विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. शरीरशास्त्र आणि रक्तविज्ञान या विषयांना विद्यार्थ्यांनी सर्वात कमी प्रतिसाद दिला आहे. प्राधान्यक्रम न भरल्याने पहिल्या फेरीसाठी पात्र न ठरलेले विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी नव्याने अर्ज करू शकतील. यावेळी प्राधान्यक्रमांसह अर्ज व्यवस्थित भरल्यास या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेसाठी विचार होणार आहे.
देशात रेडिओलॉजी विषयाला विद्यार्थी पसंती देत असताना महाराष्ट्रात मात्र विद्यार्थ्यांचा वैद्यकशास्त्राकडे अधिक कल आहे. राज्यामध्ये रेडिओलॉजी हा विषय नवव्या क्रमांकावर आहे. तसेच देशभरात फक्त ६ टक्के विद्यार्थ्यांनी शल्यचिकित्साशास्त्र शाखेची निवड केली असताना राज्यातील प्रवेशांमध्ये हे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे.