नवी दिल्ली (वृत्तसंस्था): प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीमध्ये शिकणाऱ्या सांगलीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेमध्ये हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. मंगळवारी दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून त्याने आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होते. तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. शौर्य हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी होता.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीवनगर भागात भागात कुटुंबीयांसोबत राहत होता. दिल्लीच्या या धक्कादायक घटनेने शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
१८ नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी नेहमीप्रमाणे शौर्य शाळेसाठी घरातून बाहेर पडला होता. त्याच दिवशी वडील आईच्या उपचारासाठी कोल्हापूरला जायच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांना शौर्य मेट्रो स्टेशनवरून खाली पडल्याची माहिती देणारा फोन आला. धावपळ करत रुग्णालयात पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी शौर्यला मृत घोषित केले होते. या घटनेनंतर शौर्यची शाळेची बॅग तपासण्यात आली आणि त्यात एक चिठ्ठी मिळाली. त्या नोटमध्ये त्याने आई-वडिलांची माफी मागितली आणि आपल्या अवयवांचे दान करण्याची विनंती केली होती. पण सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे त्याने शाळेतील काही शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केलेल्या मानसिक छळाचाच उल्लेख आत्महत्येचे कारण म्हणून केला होता.
संबंधित शिक्षकांची पोलिसांकडून चौकशी
वडील प्रदीप पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक, को-ऑर्डिनेटर आणि दोन शिक्षकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एका शिक्षिकेने ‘तुझ्या पालकांना बोलावून तुझे अॅडमिशन रद्द करेन’ अशा धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. १८ नोव्हेंबरला वर्गात शौर्यचा तोल जाऊन तो पडल्यावर, त्यावर थट्टा करत ‘हे सगळे नाटक आहे’, असे वर्गासमोर त्याला हिणवण्यात आले. शौर्य रडू लागल्यावरही ‘रडलास तरी मला काही फरक पडत नाही’ अशा शब्दांत त्याला अधिक त्रास दिला गेला, अशी माहिती मित्रांकडून मिळाली आहे. त्यावेळी मुख्याध्यापकही उपस्थित होते, पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही, असा आरोप आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरु असून संबंधित शिक्षकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. शिक्षण देणाऱ्यांकडूनच जर मानसिक छळ होत असेल, तर विद्यार्थी कोणाकडे पाहणार?