मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. एकूण दोन टप्प्यात पूर्ण केल्या जाणाऱ्या या पुनर्विकास प्रकल्पाचे पूर्णतः बांधकाम प्रथमच महानगरपालिका करणार आहे. या अंतर्गत बाधित होणाऱ्या प्रथम टप्प्यातील ३ इमारती महापालिकेच्या ‘एन’ विभागाकडून मंगळवारी १८ नोव्हेंबर २०२५ रिकाम्या रिकाम्या करण्यात आल्या.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीखाली, सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
विक्रोळी पार्कसाईट येथील या पुनर्विकासात एकूण २८ इमारती बाधित होत आहेत. या सर्व इमारती सी-१ प्रवर्गातील असून अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. प्रथम टप्प्यात असलेल्या एकूण ९ अतिधोकादायक इमारतींपैकी ५ इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी प्रस्तावित एस-३ इमारतीच्या एकूण २३ मजल्यांपैकी १३ मजल्यांपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर, यातील ३ अतिधोकादायक इमारती मंगळवारी रिकाम्या करण्यात आल्या. रिकाम्या करण्यात आलेल्या या इमारती लवकरच पाडण्यात येतील.
या इमारतींमध्ये ६७ भाडेकरू वास्तव्यास होते. बाधित झालेल्या भाडेकरूंना भांडुप येथील ओबेरॉय रियल्टी येथे प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पीएपी) राखीव असलेल्या सदनिकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी सदनिका देण्यात आल्या आहेत. सदर पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाडेकरूंना त्यांच्या अस्तित्वात असलेल्या २८० चौरस फुटाच्या सदनिकेच्या बदल्यात विक्रोळी पार्कसाइट येथील नवीन इमारतींमध्ये ४०५ चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका मालकी तत्वावर वितरित करण्यात येईल.