‘मोस्ट वाँटेड’ हाफिज सईदचा कुटिल डाव
नवी दिल्ली : पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा व जमात-उद-दावा दहशतवादी संघटनाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. भारतावर हल्ल्यासाठी आता तो बांगलादेशमध्ये नवीन दहशतवादी तळच उभारले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामेवाली येथे झालेल्या एका सभेतील व्हिडीओ रेकॉर्डिंगवरून हा खुलासा झाला आहे.
खैरपूर तामेवाली येथे झालेल्या सभेत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाह सैफने म्हटले की, ‘हाफिज सईद निष्क्रिय बसलेला नाही; तो बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे. लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी बांगलादेशमध्ये सक्रिय होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यावेळी हा दहशतवादी तळ भारतावर हल्ला करणार होता, असेही त्याने म्हटले आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंगवरून सईद बांगलादेशमधील तरुणांना ‘जिहाद’च्या नावाखाली भारताविरोधात वापर करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
सैफुल्लाह सैफ हा उघडपणे भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी चिथावणी देत असल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बदल झाल्याचा दावा करत म्हटले, ‘आता, अमेरिका आमच्यासोबत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानमधील मैत्री पुन्हा एकदा वाढली आहे, असा दावाही त्याने केला आहे. विशेष म्हणजे या सभेतला लहान मुलेही उपस्थित होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा भारताविरुद्ध ‘जिहाद’ करण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलांचे शोषण सुरू असल्याचेही स्पष्ट होत आहे. बांगलादेश-पाकिस्तान संबंधातून निर्माण होणाऱ्या या नवीन, गुंतागुंतीच्या धोक्याबाबत सुरक्षा एजन्सी आता सतर्क आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीवर देखरेख वाढवण्यात आली आहे.






