मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर रंगला. या सामन्यात भारतीय संघाने 48 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आणि मालिकेतील पराभवाचा धोका दूर केला. या विजयात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा मोलाचा वाटा होता. फलंदाजीत त्याने नाबाद 21 धावा केल्या, तर गोलंदाजीत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
या शानदार कामगिरीमुळे अक्षरला सामनावीराचा किताब मिळाला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हा त्याचा तिसरा सामनावीर पुरस्कार आहे. यासह, अक्षरने विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तिघेही आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामनावीर ठरलेले खेळाडू ठरले आहेत.
सामन्यानंतर अक्षर म्हणाला, “सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मला विकेट समजली. फलंदाजांशी बोलल्यावर जाणवलं की चेंडू वेगाने येत नव्हता, त्यामुळे विकेट थोडी मंद होती. म्हणूनच मी माझ्या शैलीत फलंदाजी केली आणि गोलंदाजीत फलंदाजांना संधी न देता विकेट-टू-विकेट लांबी राखण्याचा प्रयत्न केला.” आता टीम इंडिया या मालिकेचा निर्णायक आणि शेवटचा सामना 8 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळणार आहे.