मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला असतानाच, कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या विनम्रतेने आणि संस्कारांनी सर्वांचं मन जिंकलं.
विजयानंतर हरमनप्रीतने सर्वप्रथम आपल्या कोच अमोल मुजूमदार यांची भेट घेतली आणि त्यांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतला. मैदानावर घडलेला हा प्रसंग पाहून सर्वजण भारावून गेले. विजयानंतरही आपल्या गुरूंचा आदर राखणाऱ्या हरमनप्रीतच्या या कृतीने भारतीय संस्कारांचं दर्शन घडलं.
यानंतर विश्वचषक स्वीकारण्यासाठी ती व्यासपीठावर गेली असता, बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर तिने त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. मात्र जय शाह यांनी तिला थांबवत “नको” असा इशारा दिला. या काही क्षणांच्या दृश्याने संपूर्ण स्टेडियममध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं आणि सोशल मीडियावरही हरमनप्रीतच्या या कृतीवर कौतुकाचा वर्षाव झाला.
थोड्याच वेळात हे भावनिक वातावरण जल्लोषात बदललं. हरमनप्रीतने ट्रॉफी उचलताच सहकाऱ्यांसोबत मैदानात भांगड्याचा जल्लोष सुरु झाला. फटाक्यांचा आवाज, आनंदाश्रू आणि अभिमानाची भावना, प्रत्येक क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला.
या विजयाने भारताच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. भारताने ७ गडी गमावून २९८ धावा केल्या. शेफाली वर्माच्या दमदार ८७ धावा आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळी (५५ धावा, ५ बळी) यांनी विजयाची पायाभरणी केली. दक्षिण आफ्रिकेच्या Laura Wolvaardt हिने शतक झळकवलं, मात्र तिच्या या झुंजार खेळीनेही भारताचा विजय रोखू शकला नाही.