वाहतूक बंदीमुळे वाहनचालकांना २० दिवस मनस्ताप
उल्हासनगर : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल पुन्हा ३ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत डांबरीकरणासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने हे काम हाती घेणार असून, या काळात पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावेळी पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुलावरील परिस्थिती जैसे थे असल्याची वाहनचालकांकडून तक्रार केली जात होती. आता डांबरीकरणाचे काम होणार असल्याने पुन्हा २० दिवस वाहनचालकांसाठी कोंडीचे ठरणार आहेत.
उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत येणाऱ्या या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने ठाणे वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यानुसार याबाबतची अधिसूचना जारी करून वाहनचालकांना माहिती दिली आहे.
प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कसे असतील याबाबत वाहतूक पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. यात अहिल्यानगरकडून माळशेजमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना मुरबाडच्या वेशीवर बारवी डॅम फाटा येथे प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग हा बारवी धरण रस्ता - बदलापूर रस्ता - बदलापूर - पालेगाव - नेवाळी नाका - मंलग रस्ता - लोढा पलावा/शिळ-डायघर रस्ता - पत्रीपूल - कल्याण मार्गे पुढे जातील.






