देवरूख : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होणार असे देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढणार आणि सत्तेवरही येणार, अशी स्पष्ट भूमिका खासदार नारायण राणे यांनी बुधवारी देवरूख येथील पत्रकार परिषदेत मांडली.
देवरूख येथे खासदार राणे यांच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांना दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होईल असे पत्रकारांनी विचारले असता दुष्काळ होईल, असा टोला लगावतानाच काही होणार नाही. दोघांचीही क्षमता आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उबाठासोबत आपण ३९ वर्षे पक्षात राहिलो असून त्यांना काहीच कळत नसल्याची टीका त्यांनी केली. व्होटचोरीच्यावरही भाष्य करताना याच्याशी भाजपचा काहीही संबंध नसून आम्ही विरोधकांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत, असेही राणे यांनी यावेळी म्हणाले.
विरोधक उगाचच हा मुद्दा उचलून धरत आहेत. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. काँग्रेसने इतके वर्ष सत्तेत राहून जे काही केले त्यांना आम्हाला विचारण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
मुसळधार पावसामुळे कोकणात मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे सर्व्हे केले गेलेत. त्याचा अहवाल येताच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई सरकारमार्फत दिली जाईल. देवरूखमधील जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांचे प्रश्न त्वरित सोडवले जावेत हाच जनता दरबाराचा उद्देश असल्याचे राणे यांनी सांगितले. नागरिकांचे प्रश्न, अडचणी सोडवणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे. ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे यावेळी राणे म्हणाले.
खा. नारायण राणे यांचा दृढ विश्वास
पंतप्रधान मोदी यांचे कौतुक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना राणे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे गेल्या ११ वर्षांत विकसित देशाच्या दिशेने देश नेत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत त्यांनी देशाला चौथ्या क्रमांकावर आणले आहे. देशाचे दरडोई उत्पन्न वाढणे म्हणजे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणे. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. जनतेला कशाप्रकारे सुविधा दिल्या पाहिजेत याबाबतचे कायदे व नियम कार्यकर्त्यांनी वाचले पाहिजेत. मी प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतो. म्हणून इतके वर्ष राजकारणात आहे. निवडणुका येतील व जातील परंतु पक्षासाठी जे काम करतील त्यांनाच पदे मिळतील. पक्ष ध्येयधोरणांवर चालतो. पक्षासाठी कोण काम करतो व कोण करत नाही. हे विचारले जाईल. त्यामुळे आत्तापासूनच कामाला लागा. जनतेच्या अडचणी दूर करा. पक्षामार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवा, रत्नागिरी जिल्हा समृद्ध करण्यासाठी काम करा, असे कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले.