मुंबई : भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव आणि मन्नारच्या आखाताच्या भागात ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची, तसेच काही ठिकाणी ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी झोत येण्याची शक्यता आहे. या काळात मच्छिमारांना समुद्री भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
२० आणि २१ ऑक्टोबर रोजी या वादळी स्थितीचा प्रभाव आणखी काही भागांपर्यंत वाढण्याची शक्यता असून, पूर्व आणि मध्य अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये ताशी ३५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, लक्षद्वीप, मालदीव आणि आग्नेय अरबी समुद्र परिसरात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असून, समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनी खबरदारी घ्यावी आणि शक्यतो समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आयएनसीओआयएस यांनीही उंच लाटांचा विशेष इशारा जारी दिला आहे.
राज्य शासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व मच्छिमार बांधवांना आवाहन केले आहे की, हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पुढील आदेश मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याची दक्षता घ्यावी.