मुंबई : राहुरीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजराने निधन झाले. यांच्या आकस्मिक निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद प्रसंगी एक्स वर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. ते म्हटले आहेत की,“शिवाजीराव कर्डीले हे ग्रामीण भागाची नाडी ओळखणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजकारण करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी राहुरी मतदारसंघ आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून कार्य केले. त्यामुळेच त्यांना सलगपणे जनतेने आपला विश्वास दिला. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याच्या विकासातही मोलाची भर घातली.”
“त्यांच्या अचानक जाण्याने राहुरी मतदारसंघातील संवेदनशील, लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने केवळ कर्डीले आणि जगताप कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार कर्डीले यांच्या कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त केल्या असून, “या कठीण प्रसंगात कुटुंबीयांना ईश्वराने सामर्थ्य द्यावे,” अशी प्रार्थना केली. त्यांनी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.