रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.
“कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास”
शिंदे म्हणाले, “शिवसेनेमध्ये सर्व माजी आमदार आले आहेत. पिठावर बसलेले हे शिवसेनेचे वैभव आहे, तर समोर बसलेले कार्यकर्ते हे आमचे ऐश्वर्य आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे.”
ते पुढे म्हणाले, “कोकणातील शिवसैनिकांनी बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर अपार प्रेम केले. कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे, तर शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास आहे. 1995 पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे आणि पुढील 56 वर्ष तो तसाच फडकत राहील.”
“खरी शिवसेना धनुष्यबाणाचीच”
शिंदे म्हणाले, “गेल्या निवडणुकीत आमची निशाणी धनुष्यबाण होती, आणि आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तीच राहणार आहे. विरोधकांना प्रश्न पडतोय. खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण एवढ्या वेगाने चालेल की विरोधकांची पळता भुई थोडी होईल.”
“शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही”
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना शिंदे म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. हे अभिवचन दिले होते त्यानुसार 32 हजार कोटींचे पॅकेज मंजूर केले असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे.”
“देणारे हात माझे, घेणारे नाहीत”
“शिवसेना आणि एकनाथ शिंदे नेहमीच आपत्तीच्या काळात आघाडीवर राहिले आहेत. माझे हात देणारे आहेत, घेणारे नाहीत,” असे शिंदे म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 1800 कोटींच्या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी झाली असून सिंधुदुर्गलाही यापुढे भरीव निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख
शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती, एसटीमध्ये महिलांना 50% सवलत, शेतकरी सन्मान, वयोश्री अशा अनेक योजना आम्ही राबवल्या आहेत. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ‘शासन आपल्या दारी’ मोहीम राबवली आणि त्याचा पाच कोटी जनतेला फायदा झाला.”
“विरोधकांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे”
विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले, “लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवून त्यांनी काही जागा जिंकल्या, पण विधानसभेत त्यांना जनतेने नाकारले. ते आता निवडणूक आयोगाकडे धावत आहेत. जिंकल्यावर ईव्हीएम चांगले आणि हरल्यानंतर खराब असते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “विरोधक पराभवाच्या भीतीने रडीचा डाव खेळत आहेत. पण शिवसैनिक रडत नाही, तो लढतो. आम्ही जनतेच्या मनातील सरकार आहोत आणि आता दुसरी इनिंग सुरू झाली आहे.”
“विकास आणि विचार — दोन्ही आमचे ध्येय”
“मुंबई–सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड महामार्ग हा कोकणासाठी गेमचेंजर ठरेल. या मार्गामुळे रोजगाराच्या संधी वाढतील,” असे शिंदे म्हणाले.
ते म्हणाले, “आपण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित आहोत. विरोधक प्रॉपर्टीचे वारस असतील, पण आम्ही भगव्याच्या विचारांचे वारस आहोत. भगव्याचा अपमान सहन करणार नाही.”
शेवटी शिंदे यांचा कार्यकर्त्यांना संकल्प
“घराघरांमध्ये शिवसेना पोहोचवा, महायुतीच्या योजना जनतेपर्यंत न्या. येणारी कोणतीही निवडणूक आपण जिंकायचीच. भगवा फडकवण्याची, विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची आणि कोकणचा कायापालट करण्याची शपथ घेऊया,” असे शिंदे यांनी आवाहन केले.