मुंबई : मुंबईतील ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पुरविणारे शेकडो डबेवाले येत्या २० ऑक्टोबरपासून पाच दिवसांच्या रजेवर जात आहेत.
बहुतांश डबेवाले पुण्यामधील मावळ भागातील असून अनेकांनी दिवाळीनिमित्त गावी जाण्याचा बेत आखला आहे, तर अनेकजण मुंबईत राहूनच दिवाळी साजरी करणार आहेत. गेली अनेक वर्षे मुंबईतील विविध कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना नित्यनियमाने दररोज घरचा दुपारचा जेवणाचा डबा पोहोचवण्याचे काम मुंबईचे डबेवाले करतात.
मात्र, दरवर्षी गावची यात्रा, पंढरपूरची वारी व अधूनमधून मोजक्या सणाच्या दिवशी ते सुट्टी घेतात. यंदा दिवाळीनिमित्त डबेवाल्यांनी पाच दिवसांची सुट्टी घेतल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार आहे.