नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला असून, युवा सलामीवीर यशस्वी जायस्वाल याच्या शानदार दीडशतकी खेळीमुळे भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. दिवसअखेर भारताने २ गडी गमावून ३१८ धावा केल्या.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आज सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताला ५८ धावांवर पहिला धक्का बसला, जेव्हा अनुभवी फलंदाज केएल राहुल ३८ धावा करून बाद झाला. त्याला जोमेल वॉरिकनने यष्टिचित केले.
यानंतर, यशस्वी जायस्वाल आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १९३ धावांची मोठी भागीदारी करत विंडीजच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.
यशस्वी जा स्वालने आपला धडाका कायम ठेवत शानदार शतक पूर्ण केले आणि दिवसअखेर नाबाद १७३ धावांवर (२२ चौकारांसह) खेळत होता. त्याने आपल्या सातव्या कसोटी शतकांपैकी पाचवे शतक १५० हून अधिक धावांचे केले आहे.
साई सुदर्शननेही चांगली फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले, पण तो ८७ धावांवर (१२ चौकारांसह) वॉरिकनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला आणि त्याचे पहिले कसोटी शतक अवघ्या १३ धावांनी हुकले.
शुभमन गिल क्रीझवर
साई सुदर्शन बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल मैदानात आला आणि त्याने दिवस संपेपर्यंत यशस्वी जैस्वालला चांगली साथ दिली. शुभमन गिल २० धावांवर नाबाद आहे. वेस्ट इंडिजकडून फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकनने दोन्ही (२) बळी घेतले.
पहिला दिवस भारताच्या नावावर राहिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल द्विशतकाकडे कूच करेल, तर टीम इंडिया लवकरच मोठी धावसंख्या उभारून वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित करेल. दोन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.