नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. मोदींनी बटण दाबून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर किसन मोहोळ, उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन लंडनस्थित झहा अदीद या वास्तुविशारद कंपनीने केले आहे. भारतीय संस्कृतीपासून प्रेरित होऊन आणि राष्ट्रीय फुल असलेल्या कमळाच्या संकल्पनेवर आधारित 'तरंगणारे कमळ' हे विमानतळाचे केंद्रबिंदू आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. यातील पहिला आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत अंधेरी पूर्वेला आहे तर दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत आहे. नवी मुंबईच्या विमानतळामुळे या परिसरातील आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती. तेव्हापासून या विमानतळाच्या प्रकल्पाचं काम सुरू होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी हवाई दलाचे सी-२९५ आणि सुखोई या दोन विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं होतं. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत या विमानतळाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला झाले असले, तरी पहिले विमान डिसेंबर महिन्यात उड्डाण घेणार आहे. पहिल्या उड्डाणासाठी एअर इंडिया, इंडिगो किंवा अकासा एअर यापैकी कोणते विमान असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या विमानतळाला चार मुख्य प्रवेशद्वार आणि तीन केंद्रे आहेत. अल्फा, ब्रावो आणि चार्ली. त्याचबरोबर, एकूण ८८ चेक-इन काऊंटर असून, यापैकी ६६ काऊंटरवर कर्मचाऱ्यांनद्वारे चेक-इन केले जाईल, तर २२ काऊंटरवर सेल्फ चेक-इनची सुविधा असेल. सुरुवातीच्या काळात विमानसेवा सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेतच सुरू राहील. विमानतळाची पूर्ण क्षमता ४० एटीएम इतकी असली तरी प्रारंभी फक्त १० एटीएम वर ऑपरेशन सुरू होईल, म्हणजे तासाला दहा विमानांची उड्डाणे किंवा लँडींग होऊ शकतील.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सोयी
पाऊस किंवा धुक्याच्या काळात सुरक्षित लँडिंगसाठी अत्याधुनिक नॅव्हिगेशन आणि सेफ्टी सिस्टम्स बसवण्यात आल्या आहेत.
डिजी यात्रा तंत्रज्ञान लागू करण्यात आले असून, यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
पारंपरिक फूड कोर्टऐवजी येथे फूड हॉल संकल्पना आणण्यात आली आहे, जिथे प्रवासी विविध स्टॉल्सवरून एकत्रित ऑर्डर देऊन जेवण मिळवू शकतील.
विमानतळ परिसरात भारतीय कलावैभवाचे दर्शन घडवणाऱ्या डिजिटल इंस्टॉलेशन्स, फॅब्रिक फॉरेस्ट, आणि धाग्यांच्या कलाकृतींनी सजावट करण्यात येणार आहे.