अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. दुसऱ्या दिवशी केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी शतकी खेळी करत टीम इंडियाला जबरदस्त आघाडी मिळवून दिली.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १६२ धावा केल्या होत्या. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ विकेट गमावून ४४८ धावा केल्या आणि २८६ धावांची मोठी आणि निर्णायक आघाडी घेतली आहे.१ बाद १२१ धावांवरून दुसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात करणाऱ्या राहुलने आपले ११वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने संयमी फलंदाजी करत १०० धावा (१९७ चेंडू, १२ चौकार) केल्या आणि संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. कर्णधार शुभमन गिलनेही राहुलला चांगली साथ दिली आणि ५० धावा (१०० चेंडू, ५ चौकार) करत दमदार अर्धशतक झळकावले. त्याने आणि राहुलने तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. गिल रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बाद झाला.
ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक
केएल राहुल बाद झाल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सांभाळला. ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत नेले. तो १५ चौकार आणि ३ षटकारांसह १२५ धावा करून बाद झाला.
जडेजाचा शतकी धमाका
एकाच डावात भारताकडून हे तिसरे शतक होते. अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपला शानदार फॉर्म कायम ठेवत दमदार शतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत जडेजा १०४ धावांवर (नाबाद, १७६ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार) आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत होते.
ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी २०६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि वेस्ट इंडिजला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले.