नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदींनी राजघाटावर पुष्पांजली अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यावेळी उपराष्ट्रपती आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
पंतप्रधानांनी त्यांच्या 'X' खात्यावर पोस्ट करून बापूंच्या स्मृतींना वंदन केले. त्यांनी लिहिले की, "गांधी जयंती हा प्रिय बापूंना त्यांच्या अलौकिक जीवनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या आदर्श विचारांनी मानवी इतिहासाची दिशा बदलली. त्यांनी दाखवून दिले की धैर्य आणि साधेपणाच्या बळावर मोठे बदल कसे घडवता येतात. विकसित भारत निर्माण करण्याच्या आमच्या कार्यात आम्ही त्यांच्याच मार्गावर चालत राहू."
याशिवाय, पंतप्रधान मोदींनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाट येथे जाऊन त्यांनाही आदरांजली वाहिली. देशभरात आज महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती साजरी होत असून, संपूर्ण देश बापूंच्या सेवा आणि करुणा या मूल्यांचे स्मरण करत आहे.