नागरिकांना सावधानतेचा इशारा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच गंगापूरसह पुनंद आणि चणकापूर धरणातून विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. दुपारी गोदावरीला पूर आला असून सायंकाळी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी आले आहे.
प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणात मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ४८ दलघफू इतक्या पूर पाण्याची आवक झाली. विसर्गामुळे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्याला सोमवार पाठोपाठ मंगळवारीही ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला. शहरात मध्यम सरींचा हलका वर्षाव झाला; मात्र जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर ग्रामीण भागात संततधार सुरू राहिल्यामुळे धरणांची पातळी वाढत आहे. गंगापूर समूहातील कश्यपी, गौतमी-गोदावरी ही धरणेही शंभर टक्के भरल्यामुळे या धरणांमधूनही विसर्ग गंगापूरमध्ये करण्यात येत आहे. यामुळे गंगापूरमधून विसर्गात मोठी वाढ केली जात आहे. गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. रामकुंडात दुपारी ३ वाजता ७,२०४ क्युसेक इतके पाणी वाहत होते. रात्री ८ वाजता १५ हजार ७७६ क्युसेक इतके पाणी गंगापूर धरणातून विसर्ग केल्याने गोदावरीला पूर आला आहे.
मालेगावला पावसाने झोडपले
मालेगाव शहर व तालुक्यात घटस्थापनेच्या दिवशी पावसाने जोरदार आगमन करीत परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे शहरासह तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शहरात गेल्या २४ तासांत पडलेल्या ४८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चणकापूर व पुनंद धरणातील जलस्तर वाढत असल्यामुळे चणकापूरमधून १७९७७ क्युसेकने गिरणा नदीपात्रात तर अर्जुनसागर (पुनंद) धरणातून ६८०० क्युसेकने पुनंद नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. मनमाड तसेच येवला तालुक्यातही पाऊस सुरू आहे.