छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
विभागात ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली नांदेड या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली .पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. मराठवाड्यात सर्वदूर पूर परिस्थिती असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.
सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बीड जिल्ह्याला बसला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज शाळांना सुट्टी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील नळवंडी, नेकनूर, येळंबघाट, कडा, टाकळसिंग, डवळा वडगाव, धानोरा, पिंपळा, दादेगाव, पाटोदा, लोखंडी, केज, युसूफ, होळ आणि शिरुर या मंडळात अतिवृष्टी झाली.
लातूर जिल्ह्यातील लातूर, कासारखेडा, मोघा, तोंडार आणि धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी, पडोळी, कासेगाव, तुळजापूर, अनाळा, कळंब, इटकूर या मंडळात अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
परभणी जिल्ह्यातील परभणी, माखणी, बोरी, दुधगाव आणि हिंगोली जिल्ह्यातील वाकोडी, डोंगरकडा मंडळात अतिवृष्टी झाली असून प्रशासन सतर्क आहे
शिरुर मंडळात १०४ मिमी पाऊस झाला.
बीड जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर केकाणवाडी पाझर तलाव आणि राक्षसवाडी साठवण तलाव फुटला. पुलावर पाणी आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा मंडळांमध्ये तीन ते सहापर्यंत अतिवृष्टी होऊन ७० मिमी पावसाची नोंद झाली. देऊळगाव बाजार येथे चारना नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
मराठवाड्यात चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विशेषत: बीड जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, केज तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पूर परिस्थितीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. मराठवाड्यात ३२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. आष्टी तालुक्यातील कडा, पिंपरखेड, निमगाव चोभा या भागामध्ये सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे कांबळी, कडी नदीला महापूर आला. धामणगाव येथील अफरोज बागवान (वय ३०) व घाटा पिंपरी येथील श्रावण तुकाराम शिंदे (वय ५९) हे पुरात वाहून गेले. अचानक मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरल्याने नागरिक पुरात अडकले. पुरात अडकलेल्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून ५१ जणांना बाहेर काढण्यात आले.