३४ हजार ७१४ लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद
अलिबाग (प्रतिनिधी) : रेशनवरील धान्याची उचल वेळोवेळी न करणाऱ्यांचा नियमित धान्य पुरवठा आता बंद होणार आहे. राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने तशी पावले उचलायला सुरुवात केली आहे. सलग सात महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या रायगड जिल्ह्यातील १२ हजार ९४५ कार्डवरील ३४ हजार ७१४ व्यक्तींचे धान्य बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतील मिळून ४ लाख ४८ हजार ८६९ एवढी रेशनकार्ड आहेत. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत धान्य न उचलल्याने सद्यस्थिती धान्य पुरवठा बंद केला आहे, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. रेशनकार्ड धारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. लाभार्थी असूनही धान्य उचलत नसल्याने अशा ग्राहकांचे धान्य बंद करून इतर लाभार्थ्यांना मिळावे, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजनाही बंद केली आहे.
मागील काही वर्षे सणासुदीच्या दिवसात गोरगरीब नागरीकांना सण उत्साहात, आनंदात साजरा करता यावा यासाठी मैदा आदी शिधा अवघ्या १०० तेल, साखर, रवा, चणाडाळ, रुपयांत दिला जात असे. कधी कधी उशिरा का होईना गोरगरीबांना तो मिळत होता; परंतु शासनाने तो आता बंद केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही हा शिधा मिळालेला नाही.
माहितीच्या आधारे सलग सात महिने धान्याची उचल न केलेल्या १२ हजार ९४५ कार्डवरील ३४ हजार ७१४ व्यक्तींचे धान्य बंद केले आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत संर्व अंत्योदय आणि प्राधान्य योजने अंतर्गत मोफत धान्य दिले जाते. यामध्ये अंत्योदय कार्ड धारकांना प्रतिकार्ड ३५ किलो, तर प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य ५ किलो मोफत धान्य मिळते. असे असूनही लाभार्थी धान्य उचलत नसल्याचे तपासणी अंती लक्षात आल्यावर गेल्या सात महिन्यांपासूनच धान्य बंद केले आहे.