Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

  31

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा आता ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाला आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिवनेरीवर पोहोचताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजाच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न हा केवळ एका समाजाचा नसून न्याय आणि समानतेचा मुद्दा असल्याचे सांगितले. “समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळायलाच हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रश्नात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि समाजाला साथ द्यावी,” असे ते म्हणाले. तसेच, मुंबई गाठण्याचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही मुंबईला जाणारचं. सरकारने आडमुठेपणा सोडून मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी,” असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला. शिवनेरीसारख्या ऐतिहासिक भूमीवरून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा मिळत असून, पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.



आरक्षणाच्या लढ्याला नवा जोर


“रायगड, शिवनेरी यांसारख्या गडकोटांमधून आम्हाला प्रेरणा मिळते. मराठा समाज प्रचंड वेदनांत आहे आणि या वेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतल्या पाहिजेत. समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला साथ दिली पाहिजे,” असे जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी फडणवीसांवर थेट प्रहार करत “मुख्यमंत्री कुणालाही थांबवणार नाहीत. न्यायालयाने जे सांगितले त्यानुसार आम्हीच पावले उचलली. न्यायदेवतेने परवानगी घ्या असे सांगितले आणि आम्ही घेतली. मात्र, फक्त एका दिवसाची परवानगी देणे म्हणजे समाजाची चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, मग परवानगी एक दिवसाची असो किंवा कायमची,” अशी टीका त्यांनी केली. सरकारने मुद्दाम मर्यादित परवानगी दिल्याचा आरोप करत जरांगे म्हणाले की, “जाणूनबुजून तुम्ही केवळ एका दिवसाचीच परवानगी दिली आहे. पण समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लढा आणखी तीव्र केला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. शिवनेरीवरून दिलेल्या या वक्तव्यामुळे मराठा आंदोलनाला नवा वेग मिळाला असून, पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



“शिवनेरीच्या पायथ्याशी उभा राहून तुम्हाला शब्द देतो...”


मनोज जरांगे पाटलांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी उभं राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावनिक आवाहन केलं. त्यांनी फडणवीसांना अद्याप संधी असल्याचं सांगत या संधीचं सोनं करण्याचं आवाहन केलं. “देवेंद्र फडणवीस, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. ही संधी वाया जाऊ देऊ नका. तुम्ही आमचे वैरी नाही, पण मराठाविरोधी भूमिका सोडा. मी इथं शिवनेरीच्या पायथ्याशी उभा राहून सांगतो – तुमच्याकडे योग्य संधी आहे. मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, आणि लक्षात ठेवा... हेच मराठे तुम्हाला मरेपर्यंत उपकार विसरणार नाहीत. हा माझा शब्द आहे,” असं जरांगे पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाने आंदोलनाला भावनिक कलाटणी मिळाली असून, शिवनेरीवरून उच्चारलेला हा संदेश राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरणार असल्याचं मानलं जात आहे.


मनोज जारण गे पाटील यांच्या मागण्या कोणत्या आहेत नेमक्या?


१. मराठा–कुणबी एकच असल्याची अंमलबजावणी
मराठा आणि कुणबी समाज हे एकच आहेत, हे शासनाने तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी. याशिवाय मुंबईतून मागे हटणार नाही, असा ठाम इशारा जरांगे पाटलांनी दिला.


२. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी
हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास मागील १३ महिन्यांपासून सुरू आहे, पण निर्णय होत नाही. सातारा व बॉम्बे गॅझेटियरप्रमाणेच हैदराबाद गॅझेटियरही तातडीने लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.


३. ‘सगे–सोयरे’चा अध्यादेश स्पष्ट करावा
सगे–सोयरे संदर्भातील अध्यादेश निघून दीड वर्ष झालं, तरी अंमलबजावणीत ढिलाई आहे. ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून उपलब्ध आहेत, त्यांचे सगे–सोयरे ‘पोटजात’ म्हणून ग्राह्य धरावेत, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.


४. सरसकट गुन्हे मागे घ्यावेत
आंदोलनाच्या काळात मार खाऊन, त्रास सहन करूनही मराठा समाजावर गुन्हे दाखल झाले. हे सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांची सरकारने जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.


५. कायद्यात बसणारं आरक्षण
मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या टिकणारे, शाश्वत आरक्षण द्यावे. केवळ आश्वासनांवर समाजाला फसवू नये, असं जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना

"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया

मनोज जरांगे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी युट्यूबरला काळं फासलं, कपडे फाडले

छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका